आजी-माजी आमदार, खासदार झोपले का ? आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शिर्डी-नगर रस्त्यासाठी ४३० कोटी रूपये मंजूर झाले, पण शिर्डी-कोपरगाव रस्त्यासाठी ढबू पैसादेखील मिळाला नाही.

आजी-माजी आमदार खासदार झोपले आहेत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग ऊर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला. पावसाळ्यात कोपरगाव-शिर्डी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

१४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास लागतात. खड्डय़ांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

दरवर्षी महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाइन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होत नाही, असे साहनी म्हणाले.

शिर्डी-कोपरगाव रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याकरिता आमदार, खासदारांकडून सरकारवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. याबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे.

कुंभकर्णी निद्रेत असलेल्या आजी-माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, विविध पक्षाच्या नेत्यांमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या बाजारपेठ व उद्योगावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भीती सहानी यांनी व्यक्त केली.

सरकारी यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परिस्थिती झाली आहे. कोपरगाववासीयांच्या नशिबी मात्र खडतर प्रवास कायम आहे.

येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव-शिर्डी रस्त्यासाठी जनतेलाच मोठा लढा उभारावा लागेल, असे साहनी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment