नेहरू पुतळ्या भोवती उभारण्यात आलेले होर्डिंग्ज”तुम्ही हटवता, की आम्ही हटवू ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज ‘तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू’ असा आक्रमक पवित्रा घेत

विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी जाब विचारला.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज याबाबत मनपा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांचे दालन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ‘अमर रहे, अमर रहे, पंडित नेहरू अमर रहे’ या घोषणांनी दणाणून गेले होते. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप, प्रवीणभैय्या गीते पाटील, अमीत भांड, प्रमोद अबुज, राजभैय्या गायकवाड, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, राज मयूर घोरपडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल,

सिद्धार्थ कारंडे, ऋतिक शिराळे, आदित्य तोडमल, जय शिंदे, साहिल शेख, पप्पू डोंगरे मनोज उंद्रे निखिल गलांडे जोय त्रिभुवन अशोक गायकवाड, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड आदींसह विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लालटाकी येथे अनेक वर्षांपासून पंडित नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र या पुतळ्याची आणि परिसराची मनपाच्या अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. इंग्रज राजवट असताना पं.नेहरू यांना भुईकोट किल्ल्यामध्ये कैद करून ठेवण्यात आले होते.

आता इंग्रजांची राजवट नसून लोकशाही आहे. असे असताना देखील नेहरू पुतळ्याच्या कंपाउंडवर चार मोठे होर्डिंग्ज व्यावसायिक उपयोजनासाठी लावून नेहरूजींच्या पुतळ्याला बंदिस्त करण्याचे पाप मनपाने केले आहे, असा आरोप यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

पं.नेहरू थोर स्वातंत्र्यसेनानी होते. काँग्रेसचे नेते होते. आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. पंडितजींच्या पुतळ्या बाबतीत मनपाकडून असा हलगर्जीपणा होणे ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी आणि भावना दुखावणारी आहे. काँग्रेसजणांच्या भावना लक्षात घेता या भावनांचा उद्रेक होण्या आधीच मनपाने हे होर्डिंग्ज तातडीने हटवावेत.

सात दिवसांच्या आत हटवले नाही तर ‘तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू’ असा थेट इशारा काँग्रेसने दिला आहे. पुतळाच्या डागडुजी बरोबरच या परिसराचे मनपाने सुशोभीकरण करून पुन्हा या स्थळाला गतवैभव मिळवून द्यावे.

परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित राहिल यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

विद्यार्थी काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्या नंतर आता मनपा काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कारवाई न केल्यास आगामी काळात काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment