अवतार मेहेरबाबा कामगार युनियन पगारवाढीसाठी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे.

सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी पाच ते सहा तारखा होऊन देखील ट्रस्ट कामगारांचे मागण्या सहानुभूतीपुर्वक सोडवित नसल्याने युनियनच्या वतीने रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नुकतीच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या तारखेत ट्रस्टने कामगारांना दरमहा तीन हजार दोनशे तीन वर्षासाठी वाढ देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसून, ट्रस्टने कामगारांना चालू वर्षी दरमहा पाच हजार तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा सहा हजार रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.

यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, राजू ढवळे आदींसह कामगार उपस्थित होते. ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार 2017 रोजी झाला होता.

त्याची मुदत मार्च 2020 मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत आहे. सदर प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी ट्रस्टी तारखेला देखील उपस्थित राहत नसल्याचा युनियनचा आरोप आहे.

चालू वर्षी पाच हजार व पुढील दोन वर्षासाठी प्रत्येकी सहा हजार रुपयाच्या पगारवाढीवर सर्व कामगार ठाम असून, सदर प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, अवतार मेहेरबाबा ट्रस्टची अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे.

इतर तरतुदीप्रमाणे कामगारांच्या पगाराची देखील तरतुद करण्याची गरज आहे. ट्रस्ट कोरोनाचे कारण पुढे करुन आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगून कामगारांना पगारवाढ देण्यास टाळाटाळ केली आहे. मात्र ट्रस्टने कोरोनाच्या काळात जागेचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

सध्या सर्व धार्मिक स्थळे सुरु झाली असून, संस्थांना ऑनलाईन देणग्या देखील मिळत आहे. ट्रस्टने कोरोनाचा मुद्दा पुढे करुन कामगारांचे हक्क हिरावून घेऊ नये. कामगारांच्या पगारवाढीसाठी न्यायलयीन लढा देण्याची देखील युनियनची तयारी आहे. मेहेर बाबांनी गोर-गरीबांचे कल्याण करण्याचा संदेश दिला.

सर्व कामगार गोर-गरीब असून, बाबांच्या विचाराने ट्रस्टींनी कामगारांची भावना लक्षात घेऊन त्यांना पगारवाढ देण्याचे सांगितले. सतीश पवार म्हणाले की, ट्रस्टने इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार आहे.

न्याय हक्काच्या मागण्यांसाठी ट्रस्टचे कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आनली आहे. कामगारांना किमान जगता यावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येण्यासाठी वेतन पुरेश्याप्रमाणात देण्याची गरज आहे. न्याय-हक्कासाठी कामगार तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment