आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री १० ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी फिरणार्‍यांवर आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज १३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९९ इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. मास्क न घालता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये,

यासाठी स्वताची तसेच स्वताच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, विनाकारण अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यादृष्टीने सतर्क झाली असून महापालिका आरोग्य विभाग,

जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठक घेऊन यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी,

असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत. त्यानंतर महानगरपालिका आणि इतर तालुक्याची ठिकाणे तसेच गावपातळीवरही विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांनाही परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाली तर कारवाई बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात तालुकापातळीवरही टास्क फोर्स, विविध यंत्रणा, विविध विभाग, महामंडळे,

शाळा-कॉलेजेस यांचे व्यवस्थापन आदींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत. दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३,

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १०, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर १३, शेवगाव ०४ आणि इतर जिल्ह ०१अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०१, पारनेर ०५, राहाता ०५, संगमनेर २१, श्रीगोंदा ०२,

श्रीरामपूर ०१आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०२, पाथर्ढी ०१, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये, मनपा १८, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत ०६, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर १२, पाथर्डी ०८, राहाता ०९, राहुरी ०४, संगमनेर १३, शेवगाव १०, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:७२७६९

उपचार सुरू असलेले रूग्ण: ८९९

मृत्यू:११२९

एकूण रूग्ण संख्या:७४७९७