वसुलीचा तर फडणविसांना दांडगा अनुभव !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत.

फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना आहे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, फडणवीस त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते,

ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत. फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे.

भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. मुळ मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जीलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीचा होता.

या जिलेटीनच्या कांड्या कुठून आल्या याचा तपास सुरु असताना हिरेन मृत्यू प्रकरण आले. या प्रकरणाचा एटीएस उत्तम रितीने तपास करत असताना भाजपाने एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली. आता त्याला आणखी फाटे फोडले जात आहेत. वास्तविक पाहता जनता महागाईने होरपळून निघत आहे.

शेतकरी आंदोलनावर ११० दिवसांनंतरही मोदी सरकार निर्णय घेत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा हा सर्व खटाटोप चालला आहे, असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. मी सरकारमध्ये असतो तर परमविरसिंह यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असे नाना पटोले म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर