खा. डॉ. सुजय विखे म्हणतात, कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला घाबरत नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आम्ही काही चुकीचे केले नाही. त्या इंजेक्शनची खरेदी आणि वाटपाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आणलेला साठा संपल्याचे आपण त्या व्हिडिओमध्येच जाहीर केले आहे.

त्यामुळे आता कारवाई काय करणार आणि जप्त काय करणार? इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला आम्ही घाबरत नाही, असे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

नगरमध्ये आढावा बैठकीसाठी आले असता खा. डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार विखे यांनी दिल्ली येथून विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता.

त्यावरून राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू असतानाच यासंबंधी आता उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, गरजू रुग्णांना मदत करण्यात काही गैर नाही.

यात आम्हाला कोणते राजकारण करायचे नाही किंवा व्यवसाय करायचा नाही. अडचणीच्या काळात विखे कुटुंबांची लोकांसोबत राहण्याची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही कितीही पक्ष बदलले तरी लोक पन्नास वर्षांपासून आमच्यासोबत आहेत.

आम्ही काही चुकीचे करणार नाही, यावर लोकांचा विश्वास आहे. आपण किती इंजेक्शन आणली याचा आकडा त्या व्हिडिओत जाहीर केलेला नाही. हा दहा हजारांचा आकडा कोठून आला माहिती नाही.

यासंबंधी बाहेरच्या कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यातील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींनी जर आपल्याला विचारले तर त्यांना आपण नक्की उत्तर देऊ. इतरांनी यासंबंधी बोलू नये. न्यायालयात याचिका दाखल झाली असली तरी चिंता नाही.

कारण आमच्याकडे सरकारी कागदपत्रांचा पुरावा आहे. आणलेली इंजेक्शन कोणाला दिली याच्या नोंदी आहेत. यामध्ये काळाबाजार झालेला नाही, त्यामुळे कायदेशीर कारवाईलाही घाबरण्याचे कारण नाही, असेही खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|