पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास म्हणाले अहमदनगर जिल्हा राज्यात नंबर वन असेल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकऱ्यांना जाणवणार नाही, याची दक्षता जाईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जीडीपी वाढेल हे लक्षात घेवून उत्पादन वाढीसाठी एकत्रीत प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे.

तसेच लक्षांकानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्याचा कृषीचा जीडीपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन असेल, असा विश्वास श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, खरीप हंगाम-२०२१ च्या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा दूरदृश्यप्रणाली अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला.

यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे,

आमदार आशुतोष काळे, आमदार रोहीत पवार, आमदार किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती काशीनाथ दाते, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार,

कृषि उपसंचालक विलास नलगे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संदीप वालावलकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा कृषि अधिकारी सुनिल राठी, आत्मा प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी आदी यामध्ये सहभागी झाले होते.

तसेच जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारीही यामध्ये सहभागी होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना खते- बियाणांची अडचण येता कामा नये. खरीप हंगामात खते- बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.

अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरीयाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदीवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेवून नियोजन करावे. खरीप हंगामासाठी सहकारी- राष्ट्रीयकृत बँकांनी लक्षांकाप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनास दिले.

तसेच जिल्ह्यात आणखी स्वयंचलीत हवामान केंद्र उभारणीबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कुकडी प्रकल्पातील जिल्हयाच्या हक्काचे पाणी जिल्हयास मिळेल. त्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि कृषि सहसंचालक बिराजदार यांनी जिल्ह्यातील आगामी खरीप हंगाम नियोजनाची माहीती सादर केली. जिल्ह्यातील खरीप हंगामाखालील सरासरी क्षेत्र ४ लाख ४८ हजार हेक्टर आहे. मात्र, या वर्षी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या संकेतानुसार पाऊस चांगला व वेळेवर झाला, तर जिल्ह्यात मागील वर्षीप्रमाणे जवळपास खरीपाची १४८ टक्के पेरणी होणे अपेक्षीत आहे.

कृषि विभागाने ६ लाख ८५ हजार हेक्‍टरवर खरिपाचा पेरणी होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन केले आहे. पार्श्‍वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या अंमलबजावणीत व्यस्त असूनही जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने खरीप हंगाम नियोजनाची पूर्व तयारी केली.

या नियोजनानुसार जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३३ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड अपेक्षीत आहे. तसेच बाजरी १ लाख ५५ हजार हेक्टर, सोयाबीन ९५ हजार हेक्टर, उडीद ५२ हजार १७८ हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टर, मूग ५४ हजार ३६६ हेक्टर, मका ७४ हजार ५३४ हेक्टर, भात १९ हजार हेक्टर, भूईमूग ९ हजार ६०० हेक्टर अशी खरीप हंगामातील पिकांची पेरणी होणे अपेक्षीत आहे.

खरीप हंगामासाठी युरीया, डीएपी, एसएसपी, संयुक्त आदी खतांची जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरीता कृषि विभागाने २ लाख ५५ हजार मेट्रीक टन खतांची मागणी नोंदवली आहे. त्यापैकी २ लाख १२ हजार १५० मेट्रीक टनाचे जिल्हयासाठी आवंटन असून आजमितीस १ लाख २८ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.

तसेच खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले ६ हजार ४२० क्विंटल बियाणांची प्लेसमेंट झाली आहे. यासोबतच कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बिज प्रक्रिया, घरघुती बियाणे, उगवण क्षमता चाचणी, हुमणी -लष्करी- बोंड आळी नियंत्रण आदी मोहिमा व प्रात्यक्षीकांची सविस्तर माहीती यावेळी देण्यात आली. तसेच त्याचा आढावा देखील पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी घेतला.

या बैठकीत व्हिसीद्वारे उपस्थित असणाऱ्या मंत्री गडाख व राज्यमंत्री तनपुरे यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना केल्या. आमदार रोहीत पवार यांनी सध्या जारी असलेले निर्बंध कृषि सेवा केंद्रांना लागू असल्याने शेतकऱ्यांची खते- बियाणे संदर्भात अडवणूक होवू नये यासाठी कृषि सेवा केंद्रांच्या निर्बंधाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकडे लक्ष वेधले.

आमदार डॉ. तांबे यांनी खतांचा बफर स्टॉक करणे, मागेल त्याला शेततळे योजना आदीबाबत लक्ष वेधले. आमदार लहामटे यांनी आदीवासी भागात खते- बियाणांची कमतरता जाणवू नये अशी मागणी केली. आमदार कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे असल्याचे नमूद करीत सोयाबीन बियाणांचा पुरेसा पुरवठा, खतांचा बफर स्टॉक व कर्जपुरवठा आदीबाबत लक्ष वेधले.

तर आमदार काळे यांनी जिल्हयात आणखी स्वयंचलीत हवामान केंद्रांची उभारणी करण्याची मागणी केली. आमदार पाचपुते यांनीही या मागणीचे समर्थन करीत आवर्तनाद्वारे मिळणाऱ्या कुकडीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|