कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करणे यास प्राधान्य द्या, असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनातील विविध विभाग त्यासाठी कार्यरत आहेत. आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता ग्रामस्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांना या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीरपणे कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. , आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हेही यावेळी उपस्थित होते.

पहिल्या सत्रात नगर आणि नेवासा, त्यानंतर श्रीरामपूर आणि राहुरी आणि शेवटी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हास्तरावरुन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे सहभागी झाले होते.

तालुकास्तरावरुन संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या, कोणत्या रुग्णवाढीचा वेग रोखण्यासाठीच्या उपाययोजना, ब्रेक दि चेन अंतर्गत करावयाची कार्यवाही, चेहऱ्यावर मास्क असणे,

सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या कोरोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण करुन बाधितांना तात्काळ उपचारांसाठी दाखल केले जाणे आवश्यक आहे. गावपातळीवरील अधिकाऱ्यांवर त्यादृष्टीने सर्वाधीक जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

कोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सुरु असले तरी वाढत्या रुग्णसेवेमुळे त्यावर ताण येऊ नये यासाठी प्राथमिक पातळीवरच सर्वेक्षणाचा वेग वाढवून बाधितांना शोधण्याची मोहिन गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संक्रमण होणारी ठिकाणे लक्षात घेऊन तेथे प्रतिबंधात्मक नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

दूध संकलन केंद्रे, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटी, बॅंका याठिकाणी गर्दी होणार नाही हे पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकऱ्यांनाच सहकार्य करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या कोरोनाचा सामना करायला हवा. गटतट पाहण्याची ही वेळ नाही, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व सरपंचांना केले. ग्रामपंचायत हे युनिट मानून काम करा.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही सगळ्यांनी नियम पाळले. बाहेरुन व्यक्ती आली ही गावात त्याला विलगीकरणात ठेवले जायचे. मात्र, आता एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीने तात्काळ तपासून घेतले पाहिजे. व्यवस्थित काळजी घेतली तर रुग्ण बरा होऊ शकतो. प्रशासन म्हणून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

मात्र, नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर कऱणे, चेहऱ्यावर मास्क लावणे या बाबी आपण पाळल्याच पाहिजेत. कोरोनासारख्या महामारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तर त्यासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. रोगाच्या सुरुवातीलाच उपचार केला तर आपल्याला ऑक्सीजनचा वापर, व्हेंटिलेटरचा वापर जास्त प्रमाणात करावा लागणार नाही.

सुरुवातीच्या टप्प्यातच व्यक्ती बरा होईल, अशा पद्धतीने सर्वांनी काळजी घ्यायला हवी, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. हिवरेबाजार येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात तेथील ग्रामपंचायतीने यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील अनुभव आणि कशापद्धतीने तेथे कोरोनाचा मुकाबला केला गेला त्याची माहिती श्री. पोपटराव पवार यांनी यावेळी दिली.

सध्या जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आता १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे योग्य काळजी घेतली गेली नाही तर असणारा संसर्गाचा धोका सर्वांनी लक्षात घ्यावा. नोंदणी करुन त्याप्रमाणे नियोजन करुन लसीकरण करण्यात यावे.

नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, यासाठी जागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली. दरम्यान, उद्या कोपरगाव, राहाता, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील ग्रामस्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशीही जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर संवाद साधणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|