नाशिक विभागात 36 हजार कुटूंबाचे घरकुलाचे स्वप्न साकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाच जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या 36208 कुटूंबाचे स्वत:च्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे.

तर 25028 घरकुलांचे बांधकामे प्रगतीपथावर आहे. रमाई आवास योजनेत नाशिक जिल्ह्यात (शहर, ग्रामीण व नगरपालिका) 5008 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर 9374 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. धुळे जिल्ह्यात 4317 घरकुले पूर्ण झाली आहेत.

तर 3301 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 3193 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर 770 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. जळगांव जिल्ह्यात 13264 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर 6718 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 10426 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर 4865 घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटूंबांसाठी 2009 यावर्षी रमाई आवास योजना सुरू केली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांत स्वतः च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या जागेवर 269 चौरस फूटाचे पक्के घर बांधण्यात येते.

सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शहरी भागासाठी नगर परिषद / नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात येते.

ज्या लाभार्थ्यांचे नाव सामाजिक-आर्थिक जात सर्वेक्षण – 2011 यादीमध्ये नाही. परंतु, ज्या लाभार्थ्यांना घराची आवश्यकता आहे. अशा लाभार्थ्यांची नावे ‘प्रपत्र -ड’ मध्ये असतील तर त्या लाभार्थींची निवड केली जाते.

या योजनेत कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.

घर बांधकामासाठी ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रूपये व नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी 1 लाख 42 हजार रूपये व नगरपालिका / नगरपरिषद व महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी 2 लाख 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते.

मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार उपलब्ध होतो. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी 1 लाख रूपये,

नगरपरिषद / नगरपालिका क्षेत्रासाठी 1 लाख 50 रूपये, महानगरपालिका क्षेत्र व मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी 2 लाख रूपये इतकी आहे. सदर योजनेचा लाभ कुटूंबांतील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.

लाभार्थ्यांने शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ग्रामविकास विभागाच्या 30 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली असून

सदर योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणान्या परंतू जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करिता 50 हजार रूपयांपर्यत अर्थसहाय्य देण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच शहरासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.