Ahmednagar News : पावसात ‘इतक्या’ जनावरांचा झालाय मृत्यू….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सलग दोन दिवस जिल्हयात पावसाची संततधार सुरू होती. यात विशेषतः शेवगाव, पाथर्डीमधील सर्व महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागली.

तसेच नगर, नेवासा, राहुरी तालुक्यातील काही गावांत घरांची पडझड झाली. या अतिवृष्टीमुळे ३३३ पशुधन दगावले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या संदर्भात अतिवृष्टीच्या संकटातील नागरीकांना आवश्यक ती मदत करावी तसेच नुकसानीचे पंचनामे तातडीने करीत त्याचा आहवाल जिल्हा प्रशासनास त्वरीत सादर करावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी जारी केले आहेत. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत जिल्हयात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडला.

विशेषतः शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील सर्वच महसूल मंडलात अतिवृष्टी झाली. शेवगाव तालुक्यातील जोहारपूर, भगूर,वरूर, आखेगाव, लांडेवस्ती येथील नागरीकांना मोठा फटका बसला. नंदीनी नदीसह कोरडगाव येथील नदीस पूर आल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागली.

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, सोमठाणे, औरंपूर, पागोरी पिंपळगाव येथील काही कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले.नागरीकांच्या बचावासाठी औरंगाबाद येथून एनडीआरएफचे पथक, नेवासा येथील पथक, पोलीस व स्थानीक नागरीकांची मदत झाली.

तसेच नगर तालुक्यातील देवगाव, रतडगाव, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या पाच गावातील सात घरांची, नेवासा तालुक्यातील घोडेगाव, शिरसगाव, सोनई( धनगरवाडी)तील ३ घरांची आणि राहुरी तालुक्यातील देसवंडी, राहुरी बु. येथील दोन घरांची पडझड झाली असल्याचे कालच्या प्राथमीक आहवालात म्हटले आहे.