Ahmednagar News : नुकसान भरपाई कधी मिळणार ? मंत्री विखे पाटलांनी थेट तारीखच सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :- राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होईल. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

राहाता तालुक्यातील वाकडी व पंचक्रोशीतील गावांमधील शेतकरी, नागरिकांचा समस्‍या महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी आज राहाता येथे जाणून घेतल्‍या. ‘शासन आपल्‍या दारी’ या शासन उपक्रमाचा आढावा ही त्यांनी यावेळी घेतला. यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून शासन योजनांची अंमलबजावणी अधि‍क प्रभावीपणे करण्‍यात यावी. वाड्या वस्‍त्‍यांवरील रस्‍त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्यात यावे.

वीज वितरण कंपनीच्‍या बाबतीत भेडसावणाऱ्या समस्‍यांबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांनी तातडीने जिल्‍हा विकास नि‍योजन समितीकडे प्रस्‍ताव पाठवावे. ट्रान्‍सफॉर्मर उपलब्‍ध होण्‍यासाठी निधी उपलब्‍ध उपलब्‍ध करुन देण्यात येईल. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

तहसील कार्यालयातून आवश्‍यक असलेल्‍या दाखल्‍याची समस्‍या दूर करण्‍यासाठी याच महिन्‍यात एका अर्जावर अनेक दाखले उपलब्‍ध करुन देण्‍याची योजना कार्यान्वित करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाचा प्रयत्‍न आहे. जमीनींच्‍या मोजणीबाबतचे बहुतांशी प्रकरण आता निकाली निघत असून,

रोव्हर तंत्रज्ञानाची यासाठी मोठी मदत झाली आहे. जिल्‍ह्यामध्‍ये सुरु झालेल्‍या शासनाच्‍या वाळू विक्री केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत असून, ६०० रुपये दराने वाळू उपलब्‍ध करुन देण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. असे ही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांनी आता कोणतीही चिंता करण्‍याचे कारण नाही. आता सरकारनेच तुमच्‍या पिकाचा १ रुपयात विमा उतरविण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याने या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल. असा विश्‍वास ही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वाकडी व पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.