शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात सुधारणा ; बाजारभाव 2300 रुपयांवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajarbhav Update : कांदा हे महाराष्ट्रातील एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात नासिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा समवेतचं बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे.

मात्र गेल्या महिनाभरापासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. महिनाभरापूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळत होता, मात्र सध्या राज्यातील बहुतांशी एपीएमसी मध्ये एक हजार रुपये प्रतिक्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर पाहायला मिळत आहे.

अशातच कांदा उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातून उत्पादकांसाठी एक आनंद वार्ता समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्याभराचा उच्चांकि दर नमूद झाला आहे. जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घोडेगाव उपबाजारात कालच्या लिलावात विक्रमी दराची नोंद झाली आहे.

काल या उप बाजारात 55 हजार 398 गोणी कांदा आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल ते 1700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर नवीन लाल कांदा 700 रुपये प्रति क्विंटल ते 2300 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री झाला. खरं पाहता मागच्या आठवड्याच्या तुलनेत काल झालेल्या लिलावात बाजारभावात थोडीशी घसरण झाली आहे.

मात्र उन्हाळी कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला मागणी असून अधिक दर मिळत आहे. खरं पाहता गेल्या आठवड्यात दरात वाढ झाल्यानंतर आवक वाढली परिणामी याचा परिणाम बाजारभावावर झाला आणि परत दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. परंतु राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत घोडेगाव उपबाजारात कांद्याला अधिक दर मिळत असल्याने परिसरातील उत्पादकांसाठी निश्चितच दिलासादायक अशी ही बातमी आहे.

दोन आठवड्यापूर्वी बाजारभावात मोठी घसरण झाली होती पण आता सरासरी दर 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.