शेतकऱ्यांनो, सब्र का फल मिठा होता है ! सोयाबीन विक्रीची घाई नको, दर वाढण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील सोयाबीन या नगदी पिकाच्या हार्वेस्टिंगच्या कामात गुंतलेला आहे. काही ठिकाणी शेतकरी बांधव सोयाबीन हार्वेस्टिंग नंतर सोयाबीन विक्रीसाठी लगबग करत आहेत. दरम्यान सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे.

मात्र शेतकरी बांधवांना सोयाबीनला अजून वाढीव दर मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेनुसार सोयाबीनचे दर लक्षनीय कमी-अधिक होत आहेत. याचं प्रमुख कारण सोयाबीनची आवक ठरत आहे. ज्या बाजार समितीत सोयाबीनची अधिक आवक होत आहे त्या ठिकाणी बाजार भाव कमी होत आहेत.

ज्या ठिकाणी आवक कमी आहे आणि मागणी अधिक आहे अशा ठिकाणी थोडे दर वाढत आहेत. जाणकार लोकांच्या मते प्रत्येक बाजारपेठेचे कॅश लिमिट, गाड्यांची लोडिंग-अनलोडिंग, तसेच स्टॉक यांची मर्यादा ही ठरलेली असते. अशा परिस्थितीत बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आणि त्यांनी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा वर नमूद केलेल्या बाबी गेल्या तर दरात घसरण ही ठरलेलीच असते. थोडक्यात व्यापाऱ्यांचे पोट भरले की शेतकऱ्यांची लुटमार सुरू होते.

अशा परिस्थितीत या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सावध पवित्रा अंगीकारणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी सोयाबीनला चांगला दर मिळावा या अनुषंगाने सोयाबीनचे आवक नेहमी स्थिर ठेवली पाहिजे. म्हणजेच सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. एकंदरीत काय शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीसाठी अजिबात घाई करायची नाही.

बाजारपेठेचा अंदाज बांधत योग्य बाजार भाव मिळाला तेव्हाच सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करायची, असा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जात आहे. दरम्यान आता केंद्र शासनाने खाद्यतेल व तेलबियांवर असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 2021 मध्ये केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी खाद्यतेल आणि तेलबियांवर स्टॉक लिमिट लावले होते. त्यामुळे निश्चितच खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आल्या.

मात्र यामुळे तेलबियांचे बाजार भाव खाली आले. यामध्ये सोयाबीनचा देखील समावेश होता. मात्र आता केंद्र शासनाच्या माध्यमातून स्टॉक लिमिट काढून घेण्यात आले असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. स्टॉक लिमिट काढले गेल्याने आता उद्योगाकडून सोयाबीनची साठवणूक सुरू झाली आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीनची मागणी वाढली आहे आणि बाजारभावात हळूहळू सुधारणा होत आहे. जाणकार लोकांनी हंगामात सोयाबीनला ₹6000 प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची अशा व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी देखील ही दर पातळी ध्यानात ठेवून सोयाबीन विक्री करावी असे आवाहन केले जात आहे.