Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये एमआयएमने माघार का घेतली? मुस्लिम समाजानेच त्यांचा एकजुटीने केला विरोध? बदलती समीकरणे दक्षिणेत ट्विस्ट आणणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लढती ऐन रंगात आलेल्या आहेत. विखे-लंके अशी होणारी लढत सध्या चर्चेत आहे. परंतु ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली त्यावेळी मात्र अनेक अर्ज आले.

यामध्ये महत्वपूर्व मानला गेला तो म्हणजे ‘एमआयएम’च्या उमेदवाराचा अर्ज. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल असे वाटत होते. परंतु आज (सोमवार) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अहमदनगर दक्षिणेतून एमआयएम’ कडून अर्ज भरलेले डॉ. परवेज अशरफी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अचानक झालेल्या या राजकीय घडामोडीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. मुस्लिम समाजातून झालेला विरोध लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. ‘एमआयएम’चा उमेदवार असल्यास भाजपला या मतविभाजनचा फायदा होतो, म्हणून मुस्लिम समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाला असे सध्या लोक चर्चा करत आहेत. दरम्यान याबाबत अद्याप अशरफी यांची बाजू समोर आलेली नाही.

मुस्लिम समाजातूनही दबाव वाढला ?
या उमेदवारीबाबत मुस्लिम समाजातूनही दबाव होता असे कानावर पडत आहे. ‘एमआयएम’ मुळे जर मतविभाजन झाले तर भाजपला याचा फायदा होईल त्यामुळे नगरमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत यासंबंधी अशरफी आणि ‘एमआयएम’चे नेते खासदार इम्प्तियाज जलील यांच्यासोबाबत देखील याबाबत बोलणी केली होती असे समजते.

सोशल मीडियातून आणि प्रत्यक्ष बैठकांमधूनही याबाबत बोलले जात असल्याचे काही लोक सांगतात. ‘एमआयएम’ला मुस्लिम समाजातील मतांचा चांगला पाठिंबा मिळतो. परंतु मतविभाजन होऊन भाजपचाच फायदा होत असल्याचे अनेक लढतीमध्ये दिसले.

त्यामुळे आता मागील काही काळापासून घडत असलेल्या विविध राजकीय घटनांतून ही राजकीय एकी झाली असून भाजपला मदत होऊ नये, यासाठी समाजाने पुढाकार घेत ‘एमआयएम’ला माघार घ्यायला लावली अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.

या सर्व घडामोडीनंतरअशरफी जिल्हाधिकारी कार्यालयात आले व उमेदवारी अर्ज मागे घेत तेथून मार्गस्थ झाले. दरम्यान काही प्रसारमाध्यमांनी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नसल्याचे कळते.