विखे कुटूंबाने सत्तेचे केंद्रीकरण केले ! कृषीभुषण प्रभावती घोगरे यांचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विखे घराण्याने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. त्यांना हे पटते का ? एकाच घरात आमदार, खासदार, जिल्हा परीषद सदस्य अशी सर्व पदे एकाच कुटूंबाकडे असल्याचे सांगत कृषीभुषण प्रभावती घोगरे यांनी विखे परिवारावर कडाडून टीका केली.आ. नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील भिस्तबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत घोगरे यांचे घणाघाती भाषण झाले. त्यांच्या भाषणास उपस्थितांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

घोगरे म्हणाल्या,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशी लोकशाही अभिप्रेत नाही. लोकशाहीचा घात करून घरणेशाहीसाठी संविधानाची निर्मीती करण्यात आलेली नाही. १९ लाख मतदार असलेल्या दक्षिण नगर मतदारसंघात भाजपाला स्थानिक नेता दिसला नाही का ? ज्याच्यावर भरवसा ठेवता येईल, जो शेतक-यांचे प्रश्‍न संसदेत मांडेल. जो महिलांसाठी गृहउद्योग, बेरोजगारांसाठी एमआयडीसी आणेल. तुम्ही राहता परिसरातून आले आणि तिथला नेता तुम्हाला आयात करावा लागला. हे दुर्देव आहे.

ही हुकूमशाही, हिटलरशाही संपवायची असेल तर तुम्ही वज्रमुठ करा. शेवटपर्यंत नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे रहा. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील, कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसणारे वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून मोठे घबाड गोळा न करणारा, धनशक्ती नसणारा तरूण मोठी हिंमत करून शरद पवार यांच्या आशिर्वादाने धनशक्तीविरोधात उभा ठाकला आहे. त्यांची धनशक्ती ही मायबाप जनता असून त्यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन घोगरे यांनी केले.

घोगरे पुढे म्हणाल्या, मतदारांमधील उत्साह पाहीला तर मतदार नीलेश लंके यांना नक्कीच दिल्लीला पाठविणार आहेत. शहरी, ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मागील २०१९ च्या निवडणूकीमध्ये तुम्ही जो उमेदवार निवडून दिला त्याने तुमचा विश्‍वास सार्थ ठरविला नाही. ग्रामीण भागात दुध, कांदा, उसाचे भाव नसल्याने शेतकरी रसातळाला गेला आहे.

विरोधी उमेदवाराने दुध, कांदा, सोयाबिन दराबाबत एखादा प्रश्‍न केंद्रामध्ये मांडला का ? विरोधी उमेदवाराचे कुटूंब स्वार्थी असून त्यासाठीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. जनतेच्या स्वार्थासाठी त्यांनी असा  निर्णय घेतलेला नसल्याची टीका घोगरे यांनी केली. यावेळी मा. मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार, जयंत वाघ, मा. महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, बाळासाहेब हराळ यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

५० खोके एकदम ओके
भाजपा सरकारकडून ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरंगात डांबण्यात आले. कोणताही आरोप सिध्द झालेला नसताना केवळ धमकाऊन अशा लोकांना पक्षात घेतले गेले. त्यानंतर ते वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यासारखे पवित्र झाले. राज्यातील सरकार पाडण्यासाठी पन्नास पन्नास खोक्यांचा वापर करण्यात आला. भ्रष्टाचारी एकत्र करून राज्य व केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. त्याचे उत्तर मतदानातून देण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगरला चांगल्या शहराचा दर्जा देऊ
नगर शहराला चांगल्या शहराचा दर्जा देण्याचा मी शब्द देतो. शहरातील एमआयडीसीची दुरावस्था का झाली ? आमच्या भागात एमआयडीसीची उभारणी झाल्यानंतर मी काळाची पाऊले ओळखून उद्योजकांना संरक्षण दिले.स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच नगर पुण्यापेक्षा सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून सुपा एमआयडीसीकडे पाहिले जाते. कुंपणाने शेत खाल्ले अशी परिस्थिती होऊ दिली नाही. नगरमध्ये राजकीय माणसांनी विळखा घातल्याने आज ही अवस्था झाली. सुपा एमआयडीसीच्या बरोबरीने नगरची एमआयडीसी उभी करण्यासाठी पुढाकार घेऊ.  नीलेश लंके उमेदवार