10 गुंठे क्षेत्रात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये अशापद्धतीने कमवतो हा शेतकरी! काय आहे पद्धत? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुमच्याकडे किती शेती आहे आणि तुम्ही त्यातून किती उत्पादन घेता याला महत्व नसून तुम्ही आहे त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतात याला सध्या खूप महत्त्व आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण इत्यादी बाबींमुळे आता कृषी क्षेत्र झपाट्याने विकसित झाल्यामुळे  अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप भरघोस असे उत्पादन मिळवता येणे शक्य झाले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासनाच्या काही योजना यांची सांगड घालून खूप चांगल्या पद्धतीने शेती करता येते याचे अनेक उदाहरणे आता समाजात आहेत. अगदी याच मुद्द्याला पकडून जर आपण अमरावती जिल्ह्यातील मासोद या गावातील राहुल किटुकले या वय वर्ष 44 असलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर तुम्हाला हा मुद्दा पटेल.

 अवघ्या दहा गुंठात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदूर बाजार तालुक्यातील मौजे मासोद या गावांमध्ये सन 2018 ते 19 पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच प्रकल्पांतर्गत श्री किटुकले यांनी पॉलिहाऊस करिता प्रस्ताव सादर केला व पॉलिहाऊसची उभारणी केली. यांच्याकडे एकूण जमिनीचे क्षेत्र हे 58 गुंठे एवढे आहे व पोखरा अंतर्गत त्यांनी जो काही पॉलीहाऊसचा प्रस्ताव सादर केला होता व त्या अंतर्गत दहा गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी सात लाख 668 रुपये म्हणजेच जवळजवळ खर्चाच्या 75 टक्के अनुदानाचा लाभ शासनाकडून मिळवला व पॉली हाऊसची उभारणी केली.

या पॉलिहाऊसमध्ये त्यांनी  पारंपारिक उत्पादनांना फाटा देत जरबेरा फुलाची लागवड करण्याचे ठरवले. याच जरबेरा फुलाच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळत असून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता देखील मिळाली आहे. याबाबतचे अधिकची माहिती देताना त्यांनी म्हटले की, दहा गुंठ्यांमध्ये उभारलेल्या पॉलीहाउस मधून त्यांना जरबेरा फुलपिकाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला अडीच हजार फुलांच्या गुच्छांचे उत्पादन मिळते.

जर हे फुलांच्या गुच्छ यांच्या स्वरूपाचा विचार केला तर एका गुच्छमध्ये दहा फुले असतात व या एका गुच्छची विक्री ही 40 रुपये प्रतिगुच्छ अशा दराने केली जाते. म्हणजेच एका महिन्याला 2500 फुलांच्या गुच्छ यांचे उत्पादन आणि प्रतीगुच्छ 40 रुपये दर हा हिशोब जरी पकडला तरी महिन्याला त्यांना तब्बल एक लाख रुपये उत्पादन मिळते.

पण उत्पादन करताना आपल्याला खर्च करावाच लागतो. परंतु त्यापैकी चाळीस हजार रुपये मजुरी व खत आणि औषध फवारणी मध्ये खर्च होऊन 60 हजार रुपयांची बचत त्यांना होते. ते त्यांच्या जरबेरा फुलांची विक्री प्रामुख्याने अमरावती शहरात व नागपूरच्या बाजारपेठेत करतात.

 पॉलिहाऊसची कल्पना कशी सुचली?

मौजे मासोद येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत संरक्षित  शेतीपद्धती अंतर्गत एक पॉलिहाऊस व सात शेडनेटची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून 8 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता यावे याकरिता प्रकल्पांतर्गत हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे येथे पाठवण्यात आलेले होते व यामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान चिटुकले यांनी आत्मसात केले व त्याचा वापर जरबेरा फुलांच्या शेतीमध्ये केला.

याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या शेतीमधून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले असून त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. त्याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून श्री चिटुकले यांनी दहा गुंठे क्षेत्रावर जरबेरा फुलांची लागवड पॉलिहाऊस मध्ये केली या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन त्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न या माध्यमातून मिळाले आहे.अशाप्रकारे मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे हे श्री राहुल किटुकले यांच्या उदाहरणावरून दिसून येते.