कौतुकास्पद ! बळीराजा घेणार उंच-उंच ‘भरारी’ ; भरारी फाउंडेशनच्या मदतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत कृषी यंत्र उपलब्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारतासारख्या कृषी प्रधान देशाचा शेतकरी राजा कणा आहे. म्हणून शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध बनेल असा विश्वास कायमच व्यक्त केला जातो. शेतकरी बांधव देखील या अनुषंगाने शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत असतात.

मात्र, देशाची अर्थव्यवस्था बळकट करू पाहणाऱ्या बळीराजाला वारंवार शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी राजा बेजार झाला असून बाजारपेठेत शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी हितेशी फाउंडेशनने अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. जळगाव तालुक्यातील धानवड येथील गरीब, गरजू व आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील शेतकऱ्यांना शेतीमधील अवजारे मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी अवजार बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

भरारी फाउंडेशनच्या पुढाकारातून कृषी विभाग आणि ममुराबादचे कृषी विज्ञान केंद्र वं पद्मालय फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्र मोफत वापरण्यासाठी दिले जात आहे. याव्यतिरिक्त रोटावेटर, पावर विडर यांसारखी उपकरणे देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

या उपक्रमाचा धानवडी गावातील 45 शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. या 45 अल्पभूधारक शेतकरी बांधवांची 100 एकर जमिनीवर या उपक्रमाच्या माध्यमातून मशागतीची आणि पेरणीची कामे केली जाणार आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोफत अवजारे उपलब्ध होतात ज्यामुळे त्यांची मशागतीची आणि पेरणीची कामे यथायोग्य परिस्थितीत आणि वेळेत पार पडत आहेत.

विशेष म्हणजे यामुळे या गरीब व गरजू शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. साहजिकच त्यांच्या उत्पन्नात यामुळे भर पडणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भरारी फाउंडेशन बळीराजांनी भरारी घ्यावी अनुषंगाने गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. हे फाउंडेशन शेतकरी आत्महत्या दूर करण्यासाठी सात वर्षापासून झिजावत असून नुकताच सुरू झालेला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या जीवनात अमलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम ठरणार आहे.

या फाउंडेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना केवळ अवजार उपलब्ध करून दिले जातात असे नाही तर त्यांचा एकात्मिक विकास व्हावा या अनुषंगाने शेतीमधील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची देखील त्यांना ओळख पटवून दिले जात असते. निश्चितच भरारी फाउंडेशनच हे अनोख काम कौतुकास्पद असून बळीराजाचा विकास घडवून आणण्यासाठी केवळ शासनाच नव्हे तर समाजकारणातील काही अशा संघटनांना देखील पुढे यावे लागेल हे यावरून स्पष्ट होत आहे.