शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! रब्बी हंगामात पिकांचे विक्रमी उत्पादन घ्या, शासनाकडून 50 हजार मिळवा ; वाचा या योजनेविषयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : आपल्या देशाचीं अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. तसेच उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते.

दरम्यान कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन देणे हेतू पीक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाते. यासाठी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि त्यांना पारितोषिके वितरित केली जातात.

यंदा देखील कृषी विभागाच्या माध्यमातून पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुकास्तरावर 5 हजार जिल्हास्तरावर दहा हजार आणि राज्यस्तरावर 50 हजार रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

दरम्यान शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या माध्यमातून या पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. या स्पर्धेसाठी 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर तीन बक्षीस वितरित केले जाणार आहेत.

त्यामध्ये पहिले बक्षीस दहा हजाराचे दुसरे बक्षीस 7000 चे आणि तिसरे बक्षीस पाच हजाराचे राहणार आहे. तसेच राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50000, दुसरे 40 हजाराचे आणि तिसरे बक्षीस 30 हजाराचे राहणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या पिक स्पर्धेसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

स्पर्धेच्या अटी तरी नेमक्या काय

कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्या नावावर जमीन असणे अनिवार्य असून ती शेतजमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत.

स्पर्धेसाठी अर्ज कुठे करायचा

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की इच्छुक शेतकरी बांधवांनी पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. जिल्हास्तरावर बक्षीसासाठी जे शेतकरी बांधव तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांकावर येतील त्यांना पात्र घोषित केले जाईल.

कोणत्या पिकांसाठी घेतली जाते पीक स्पर्धा

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, जवस आणि करडई या पाच पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. निश्चितच या स्पर्धेमुळे शेतकरी बांधवांना प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे.