Agriculture News : संतापजनक ! महिला शेतकऱ्याला मिळाली 12 रुपयाची ‘भीक’विमा भरपाई ; कंपन्यांचा अनागोंदी कारभार उघड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : वर्षानुवर्ष बळीराजाला नैसर्गिक संकटांशी दोन हात करावे लागतात. यावर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी बांधव पिक विमा उतरवतात, यंदा देखील राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. खरिपात अतिवृष्टी झाली असल्याने पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

दरम्यान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वर्ग केली जात आहे. मात्र पिक विमा नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मात्र दहा-वीस रुपये भरपाई दिली जात आहे. यामुळे पिक विमा कंपन्यांकडून बळीराजाची क्रूर चेष्टा होत असल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका महिला शेतकऱ्याला पिक विमा कंपनीने मात्र 12 रुपये नुकसान भरपाई दिली असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पिक विमा कंपन्यांकडून केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान अनेक शेतकरी संघटनांकडून पिक विमा कंपन्यांच्या या अनागोंदी कारभारावर वेळीच लगाम लावा नाहीतर त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतील असा इशारा देखील दिला जात आहे. माजलगाव तालुक्याच्या मौजे नित्रुड येथील महिला शेतकरी संगीता अशोक तातोडे यांनी 1296 रुपये एवढा हप्ता भरून पिक विमा उतरवला होता.

आता त्यांना प्रत्यक्षात बारा रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. एखाद-दोन प्रकरण राहिले असते तर कदाचित नजर चुकीने झाले म्हणून शेतकऱ्यांनी समजलं असतं मात्र अशी शेकडो प्रकरणे राज्यभरातून समोर येत आहे. तसेच मुंडे रामहरी भगवान यांनी 1674 रुपये पिक विम्याचा हप्ता भरला होता, मात्र त्यांना 122 व 244 रुपये एवढी नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली आहे.

खरं पाहता यंदा नित्रुड परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांनी 72 तासांच्या आज संबंधित पिक विमा कंपन्यांकडे सूचना वर्ग केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पिक विमा कंपन्यांकडून संबंधित शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रीम रक्कम देण्यात आली.

संगीता तातोडे तसेच मुंडे रामहरी भगवान यांना देखील 25% अग्रीम रक्कम देण्यात आली होती. मात्र उर्वरित रक्कम म्हणून संगीताताई यांना केवळ बारा रुपये आणि मुंडे रामहरी भगवान यांना केवळ 122 व २४४ रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.

विमा कंपन्यांकडून तुटपुंजी नुकसान भरपाई जमा केली जात असल्याने नेमके पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे की विमा कंपन्यांसाठी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकरी बांधवांकडून आता पिकविमा कंपनी आणि शासनाचे काहीतरी साठे-लोटे असावे असा आरोप देखील केला आहे.