Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे पिकाची जोपासना केली. मात्र नियतीला काही औरच मान्य होतं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीमधून वाचलेली पिके देखील भुईसपाट झाली.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा फटका बसला. खरिपात झालेले नुकसान भरपाई निदान रब्बी हंगामात भरून निघेल अशी भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना आशा आहे. या अनुषंगाने बळीराजा मोठ्या हिमतीने लढत आहे. मात्र नुकताच अस्मानी संकटांचा सामना करून रबीकडे वळलेल्या बळीराजाला आता सुलतानी संकट सावरू देत नाहीये. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला महावितरण ने सक्तीची वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली असून यामुळे बळीराजाचा बळी घेतला गेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातुन एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणने विज कनेक्शन कापले असल्याने आता पीक कसं वाचवायचं या विवंचनेतून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट जाधव यांची शेतीपंपाची वीज गेल्या आठ दिवसापासून खंडीत करण्यात आल्याने पिकाला पाणी कसे द्यायचे या विवंचनेतून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.

महावितरणच्या या अनागोदी दादागिरीमुळे नगर तालुक्यातील शेतकऱ्याने आपलं जीवन संपवले असल्याने महावितरण विरोधात तालुक्यात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. जाधव यांचे वीजबिल थकले होते. थकीत वीज बिल भरत नसल्याने वीज वितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता. गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज नसल्याने शेतपिकाला पाणी देण्याचा मोठा प्रश्न जाधव यांच्यासमोर निर्माण झाला होता.

जाधव यांनी शेतात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या विवंचनेतून त्यांनी काल पहाटेच्या सुमारास झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचे एकच शेवटचे वीज बिल थकीत असल्याचे सांगण्यात येते. निश्चितच महावितरणामुळे एका बळीराजाचा बळी गेला आहे. यामुळे सध्या महावितरणा विरोधात अहमदनगर जिल्ह्यात मोठी संतापाची लाट असून शिवसेनेने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तसेच ऊर्जा मंत्र्यांविरोधात पोलिसी कारवाई करण्याची मागणी केली आहे.