Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! भरपाईसाठी जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांनी तहसीलदाराशी साधावा संपर्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे.

दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झाले होते त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देऊ करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील पावसाचा लहरीपणा यावर्षी स्पष्टपणे जाणवला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाकडून मदत दिली गेली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यातही महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यातही ऑक्टोबर महिन्यात शेती पिकांचे पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे जिल्ह्यात पंचनामे देखील करण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाकडून ज्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले आहेत अशा शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. जिल्ह्यातील ज्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांचे पंचनामे बाकी असतील त्यांनी तहसीलदाराशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन आता खुद्द जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी शेतकरी बांधवांना पंचनामे राहिले असतील तर त्वरित तहसीलदाराशी संपर्क साधावा आणि आपल्या शेती पिकाचा पंचनामा करून घ्यावा असे आवाहन केले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 2 हजार 236 शेतकरी बांधवांचे एक लाख 21 हजार 628.88 हेक्टर क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे दोन लाख 98 हजार 717 शेतकरी बांधवांच्या एक लाख 84 हजार 135.17 हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

मात्र असे असले तरी यामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांचे पंचनामे राहिले असल्याचे सांगितले जात असल्याने ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे राहिले असतील त्यांनी तहसीलदाराशी संपर्क साधून आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नमूद केले आहे.

याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील एखाद्या क्षेत्राचे नुकसानीचे पंचनामे राहिले असतील तर त्याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मदत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांचे ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे चित्र आहे.