पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनुषंगाने ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात पिक विमा उतरवला होता त्यांनी संबंधित पिक विमा कंपन्यांकडे तक्रारी करून अथवा क्लेम करून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती.

या अनुषंगाने राज्यातील शेतकरी बांधवांना संबंधित पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वर्ग केली जात आहे. मात्र पिक विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत ही अतिशय तुटपुंजी असून शेतकरी बांधवांनी याला पीक विमा नव्हे तर भिक विमा असं संबोधलं पाहिजे अशा शब्दात नुकसान भरपाई बाबत आपले प्रखड मत व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातूनही पिक विमा नुकसान भरपाई बाबत असंच काहीस चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान आता जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांकडून पिक विमा कंपन्यांकडून दिलेली तुटपुंजी नुकसान भरपाई कंपनीला परत करत असल्याचे चित्र आहे. अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर येथील एका शेतकऱ्याला मात्र ४१ रुपये ९५ पैसे नुकसान भरपाई मिळाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याने 29 तारखेला म्हणजे सोमवारी ही तुटपुंजी नुकसान भरपाई जिल्हाधिकारी कार्यालयात विमा प्रतिनिधीकडे परत केली आहे.

यासंदर्भात जिल्हाअधिकारी महोदय यांना लेखी निवेदन देखील देण्यात आल आहे. सदर निवेदनात म्हटल्याप्रमाणे, यावर्षी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी बांधवांनी देखील पिक विमा योजनेच्या नियमावलीनुसार 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपनीकडे सूचना दिली.

संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपन्यांकडून दिली जात आहे. मात्र 927 रुपये विम्याचा हप्ता भरलेला असताना शेतकऱ्याला मात्र 41 रुपये 95 पैसे एवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे. निश्चितच बळीराजाची थट्टा माजवली जात आहे. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याच्या बाबतीत असं घडलेलं नसून परिसरात बहुतांशी शेतकऱ्यांना कोणाला शंभर रुपये तर कोणाला तीन हजार रुपयांची तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत पिक विमा कंपनीचा निषेध व्यक्त करत शितल सुरज लाखे यांच्या नावाने जमा झालेले 41 रुपये 95 पैसे एवढी पिक विमा नुकसान भरपाई विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आली.