Farmer Success Story: आयडियाने शेती करून शेतकऱ्याने 3 वर्षात केली 1 कोटीची उलाढाल! वाचा सतीश तोमरची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- कुठलीही गोष्ट डोक लावून व्यवस्थित नियोजनबद्ध रीतीने केली तर ती यशस्वी होते. मग ते कुठलेही क्षेत्र असो. परिस्थितीनुसार जर बदल स्वीकारत गेले तर यश मिळण्यास जास्त समस्या येत नाहीत. जेव्हा संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये कोरोनाने थैमान घातले तेव्हा सगळे जग ठप्प झालेले होते.

परंतु या महामारीनंतर प्रत्येक क्षेत्रात मात्र खूप मोठा बदल झाला व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद राहिले नाही. कारण या प्रसंगी अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक सुशिक्षित युवक शेती क्षेत्राकडे वळले. परंतु शेती क्षेत्राकडे वळत असताना मात्र त्यांनी सोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले.

अगदी याच पद्धतीने जर उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सतीश तोमर या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर याने कोरोना कालावधीत नोकरी सोडली आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. आज सतीश हे जवळपास 25 हेक्टर क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असून विविध प्रकारची पिके या माध्यमातून घेत आहेत. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.

 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलीगड जिल्ह्यातील कैथवारी या गावचे रहिवासी असलेले सतीश तोमर हे वैद्यकीय आणि औषध कंपनीमध्ये नोकरीला होते. परंतु कोरोना कालावधीच्या दरम्यान त्यांनी नोकरी सोडली व घरच्या शेतीमध्ये शेती करण्याचे ठरवले. संगणक सॉफ्टवेअरमध्ये पदवी संपादन केलेले सतीश आता पूर्णवेळ शेती करत असून त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्णपणे नैसर्गिक शेती करत आहेत.

सुरुवातीला त्यांनी त्याच्या घरच्या दहा हेक्टर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली व आज ती वाढवत 25 हेक्टर पर्यंत नेली आहे. विशेष म्हणजे या सर्व शेतीमध्ये ते सेंद्रिय उत्पादने घेतात आणि ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून ही उत्पादने ते विक्री करतात.

त्यांच्यासोबत इतर 22 जणांना या माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामागील प्रेरणा सांगताना ते म्हणतात की, नैसर्गिक शेतीची कल्पना किंवा माहिती त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. अधिकची माहिती व्हावी म्हणून त्यांनी अनेक या क्षेत्रातल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

याकरिता त्यांनी अगोदर पाच शेतकऱ्यांना सोबत घेतले व सेंद्रिय शेती सोबत नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. यामध्ये त्यांना सुरुवात करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

परंतु या समस्यांशी दोन हात करत त्यांनी उत्पादने घेतली व आज चांगला दर देखील मिळवत आहेत. अगदी सुरुवातीला त्यांची या माध्यमातून दहा लाख रुपयांची उलाढाल होत होती. परंतु आता ही उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक पोहोचलेली आहे.

 सतीश उघडणार आहेत सेंद्रिय उत्पादनांचे मिनी स्टोअर

सेंद्रिय शेती सोबत ते आता सेंद्रिय उत्पादन विक्रीकरिता मिनी स्टोअर उघडण्याचा प्रयत्न करत असून आपल्या SRH ब्रँडच्या ऑरगॅनिक फूडचे उत्पादने प्रत्येक घरापर्यंत पोहोचवता यावी त्याकरिता हे मिनी स्टोअर उघडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

याबाबत ते म्हणतात की जर हे मिनी स्टोअर्स सुरू झाले तर सेंद्रिय धान्य तसेच भाजीपाला व फळे लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचवणे शक्य होईल.

सध्या ते त्यांच्या एसआरएच ब्रँडच्या माध्यमातून मल्टीग्रेन पीठ, तांदूळ तसेच हळद पावडर, सेंद्रिय ऊस आणि साखर तसेच मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या बिया यासारखे सोळा प्रकारचे सेंद्रिय उत्पादने सध्या उपलब्ध असून त्यांची विक्री केली जात आहे.

अशाप्रकारे परिस्थितीनुसार जर बदल करून कुठलीही गोष्ट केली तर व्यक्ती कसे यशस्वी होतो? हे सतीश तोमर यांच्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल.