चर्चा तर होणारच ! नवयुवक शेतकऱ्याने 2 एकर केळीच्या बागेतून कमवलेत 15 लाख, परिसरात रंगली चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : केळी म्हटलं की सर्वप्रथम खानदेशाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत. महाराष्ट्रात खानदेश प्रांतात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनात विशेष स्थान असून जिल्ह्यातील केळ्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे.

त्यामुळे केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात नावाजलेला आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यात देखील केळी उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांकडून राबवला जात आहे. सटाणा तालुक्यातील मौजे द्याने येथील येथील एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने केळीच्या पिकातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

राजेंद्र भरत कापडणीस असे या नवयुवक शेतकऱ्याचे नाव. राजेंद्र यांनी उत्पादित केलेल्या 2 एकर केळीच्या पिकातून त्यांना गेल्यावर्षी तब्बल नऊ लाखांची कमाई झाली होती तर यावर्षी यामध्ये मोठी वाढ होऊन 15 लाखांची कमाई होण्याची आशा त्यांना आहे. यामुळे सध्या या अवलियाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

राजेंद्र उर्फ बबलू कापडणीस शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगासाठी आपल्या गावात ओळखले जातात. बबलू यांच्याकडे अडीच एकर वडिलोपार्जित शेत जमीन आहे. यामध्ये ते काळाच्या ओघात बदल करत असून नवनवीन प्रयोगाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. खरं पाहता त्यांचे वडील पूर्वी या क्षेत्रात पारंपारिक पिकांची शेती करत असत.

यानंतर त्यांच्या वडिलांनी पारंपारिक शेतीत तोटा सहन करावा लागत असल्याने फळबाग लागवड केली. डाळिंब पिकाची बाग लावण्यात आली. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत होतं मात्र काही वर्षांनी परिसरात तेल्या व मर रोगामुळे डाळिंबाचे उत्पादन घेणे अशक्य बनले. या रोगांमुळे त्याच्या वडिलांनी डाळिंब बाग क्षतीग्रस्त केली. यानंतर त्यांनी कांदा तसेच मका या पिकांची लागवड सुरू केली.

मात्र मग राजेंद्र यांनी आपल्या शेतीत बदल करण्याच्या अनुषंगाने जळगावहून जी-9 या जातीची केळी रोप मागवली आणि केळीची लागवड केली. त्यांनी दोन एकर क्षेत्रासाठी 3000 केळी रोपे मागवली होती. उर्वरित अर्ध्या एकर शेत जमिनीत जनावरांसाठी चारा उत्पादित केला जातो. या अर्धा एकरात लागवड करण्यात आलेल्या केळीपासून पहिल्याच तोड्यात त्यांना नऊ लाखांचे उत्पन्न मिळाले.

दरम्यान आता केळीचा दुसरा तोडा तयार झाला असून त्यांना यातून 15 लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे. याव्यतिरिक्त राजेंद्र पशुपालनात देखील सक्रिय आहेत. त्यांनी नऊ म्हशीचे संगोपन सुरू केले आहे. यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न होते शिवाय केळी बागेसाठी आवश्यक सेंद्रिय खतांची निर्मिती देखील यामुळे होत आहे. निश्चितच युवा शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.