कशी नशिबाने थट्टा आज मांडली ! शॉर्टसर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याचे पन्नास लाखांचे नुकसान ; नुकसानीला जबाबदार कोण?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. गेल्या वर्षी शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडात लागलेल्या आगीत शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

या वर्षी देखील महावितरण चा गलथानकार कारभार उघडकीस आला आहे. यावर्षीचा गाळपंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून गाळप हंगाम सुरू होऊन मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तोवर उसाच्या फडात आग लागण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे उसाच्या फडात आग लागण्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या अग्नी तांडवात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकीकडे महावितरण नियमावर बोट ठेवत विज बिल वसुलीचा तडाखा लावत आहे तर दुसरीकडे आपल्या गलथान कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीसाठी जबाबदारी देखील घेत नाहीये.

अशा परिस्थितीत महावितरण चे काम फक्त वीज बिल वसुली करणे एवढेच आहे की काय असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. नियमावर बोट ठेवणारे महावितरण नियमाने जर वागले असते तर शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनात कुंडल येथील 15 एकरावरील ऊस महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अग्नीच्या भक्षस्थानी आला आहे.

शॉर्टसर्किटमुळे कुंडल येथील तोडणीला आलेला 15 एकरावरील ऊस जळून खाक झाला असून यामुळे शेतकरी बांधवांचे 50 लाखांचे नुकसान झाले आहे. या अग्नि तांडवात केवळ ऊस जळाला असे नव्हे तर ठिबक सिंचन, पाईपलाईन शेतकऱ्यांचे इतर शेती कामाचे मटेरियल देखील जळून खाक झाले आहे. निश्चितच निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजासाठी ही एक निश्चितच चिंतेची बाब आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार कुंडल येथील अग्नी तांडवात चंद्रकांत जाधव, प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, संभाजी शिंदे, बाळासो शिंदे, गणेश शिंदे इत्यादी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा ऊस जळून खाक झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले ऊस पीक शेवटच्या क्षणी शेतकऱ्यांपासून हिरावून घेतले गेले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेच मात्र महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे देखील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.

महावितरणने जर आपले कामकाज व्यवस्थितरित्या केले तर शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडणार नाहीत, असे शेतकऱ्यांचे मत आहे. महावितरण ज्या पद्धतीने नियमावर बोट ठेवत शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करण्यासाठी धडपडत आहे त्याच पद्धतीने महावितरण ने शॉर्टसर्किटचा घटना थांबवण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

दरम्यान कुंडल येथील शेतकरी बांधवांचा उस जळून खाक झाला आहे त्यांना नुकसान भरपाई देऊ करण्यासाठी आता मागणी जोर धरू लागली आहे. निश्चितच महावितरणच्या एका चुकीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे महावितरणची ही चूक पहिल्यांदाच झाली आहे असे नाही तर वर्षानुवर्ष महावितरणच्या या अशा गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किटचा घटना घडतात आणि यामुळे उसाचे फडाचे-फड जळून खाक होतात. यामुळे महावितरणने देखील शॉर्टसर्किटच्या घटना थांबवण्यासाठी वेळीच उपाययोजना आखणे गरजेचे आहे.