जिल्ह्यातील ‘ हे’ आमदार कोरोनाने पती गमाविलेल्या माता-भगिनींना देणार तीन महिन्याचे वेतन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाने पती गमाविलेल्या मतदार संघातील माता-भगिनींना रक्षाबंधनाची अनोखी ओवाळणी देत तीन महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात कोरोनाने पती गमाविलेल्या विविध समाजाच्या माता भगिनींनी आ. आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली.

त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मागील वर्षापासून आजपर्यंत मतदार संघातील ज्या माता-भगिनींनी आपले पती गमाविले आहेत त्या माता भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून तीन महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, रक्षाबंधन हा बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे.

मात्र मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने प्रत्येकाच्या जवळच्या नात्यातील व्यक्ती गमावल्यामुळे प्रत्येक सणाला दुःखाची झालर आहे. ज्या कुटुंबाने घरातील कर्ता व्यक्ती गमविला आहे त्या कुटुंबाचे संसार उध्वस्त होवून त्यांचे कधीही भरून येणारे नुकसान झाले आहे.

महिलांसाठी रक्षाबंधनाचा सण हा अतिशय आवडता सण असला तरी पती गमाविलेल्या महिलांचे दु:ख खुप मोठे आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण साजरा करीत असतांना एक भाऊ, एक मुलगा म्हणून या महिलांच्या मागे उभे राहणे हे माझे कर्तव्य असून

या माता भगिनींसाठी शासनाकडून मिळणारे तीन महिन्याचे वेतन रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून या माता भगिनींना देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक माता-भगिनीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तुमच्या कुटुंबाचा आधार हरपला असतांना तुम्ही सोसत असलेले दु:ख किती मोठे आहे याची मला जाणीव आहे.

शासनाच्या वतीने ज्या काही योजना असतील त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला मिळवून देईल अशी ग्वाही देत ज्या माता-भगिनींच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले आहे त्या महिलांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून लेखी स्वरुपात माहिती द्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

यावेळी नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, श्रीमती वर्षा गंगुले, सौ. माधवीताई वाकचौरे,कोरोना पुनर्वसन समितीच्या जिल्हा समन्वयक सौ. संगीता मालकर, तालुका समन्वयक सौ. उमाताई वहाडणे सौ. वर्षा आगरकर. सौ. नीलम पाटणी, सौ. सुधा ठोळे, सौ.स्वाती चौरे आदीसह महिला भगिनी उपस्थित होत्या.

चौकट :- राज्यातील आदर्श समाजकारणी परिवार म्हणून काळे परीवाराकडे पाहिले जाते. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हि या परिवाराची शिकवण. हि शिकवण माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आयुष्यभर जपली.

तोच वारसा मा.आ.अशोकराव काळे यांनी जपला व काळे परिवाराच्या तिसऱ्या पिढीच्या रूपातून आ. आशुतोष काळे हा समाजकारणाचा वारसा पुढे चालवीत असून त्यामुळे काळे परिवाराचे समाजाशी घट्ट ऋणानुबंध जुळले आहे, असे संगीता मालकर (जिल्हा समन्वयक-कोरोना पुनर्वसन समिती) यांनी म्हंटले.