रस्त्याचे काम करा…अन्यथा मत मागायला येऊच नका! शेतकऱ्यांनी दिला इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  अत्यंत दुरावस्था झालेला इसळक ते खातगाव या रस्त्याचे काम मार्गी लागावे, अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. सोशलमीडियातून सध्या याबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे.

यातून हा रस्ता जर लवकरात लवकर मार्गी लावला नाही, तर आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी ‘मते’ मागायलाही येऊ नका, असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टची परिसरात जोरदार चर्चा आहे.

इसळक येथील शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही पोस्ट सर्वप्रथम शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हा शेतीवहिवाटीचा महत्वाचा रस्ता आहे.

प्रचंड दुरावस्था झाल्याने शेती मशागतीची आणि पिकांची काढणी करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच शेतकऱ्यांचे मुग आणि उडीदाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधी मात्र या प्रमुख आणि मुलभूत समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.