‘भाजप’ला भंगारचे गोडाऊन बनवू नका, जिल्ह्यातील ‘या’ नेत्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपची इमारत उभी केली आहे. त्यामुळे या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे करू नका, असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यांत, सर्वसामान्य जनतेत पोहोचविण्यासाठी स्व.उत्तम पाटील, वसंत भागवत, रामभाऊ म्हाळगी, हशू अडवाणी, सूर्यभान वहाडणे, राम नाईक, राम कापसे, गंगाधर फडणवीस, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, डॉ.लेले, भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले.

त्यामुळेच अनेकांना सत्ता मिळून काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात व देशात सत्ताही मिळाली. पण कालच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काँग्रेसमधून आलेले, भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांची नेमणूक करण्यात आली.

मते मिळविण्यासाठी इतका बेशरमपणा करण्याचे धाडस कोण व कशामुळे करत आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपमध्ये आलेल्या अनेक प्रामाणिक, ध्येयवादी कार्यकर्त्यांना डावलून पक्षात मनमानी सुरू आहे. मतांचे राजकारण फक्त आपल्यालाच कळते असे काही नेत्यांना वाटत असेल.

शिवाय मी एक लहान कार्यकर्ता असूनही असे सांगू इच्छितो की, काहीही करून मतेच मिळवायची असतील तर मुस्लिम मते मिळविण्यासाठी दाऊद इब्राहिमलाही पक्षात घ्यायला काय हरकत आहे. आदर्श व्यक्तिमत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा व रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची साथ असताना बाहेरून उसने आणण्याची गरजच काय? असा खोचक सवाल करत वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपची इमारत उभी केली आहे.

त्यामुळे या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे करू नका असे आवाहन करत इतर पक्षातून नेते आयात करता येतील. पण प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते मात्र दुरावतील याचे भान ठेवा असेही सूचित केले आहे. याआधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी मिळावा म्हणून तीनवेळा प्रस्ताव दिले. पण एका ढबूचीही मदत मिळाली नाही.

आयारामांच्या नादी लागून इतिहास विसरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकीदार चोर है असे अनेकदा बोलले गेले तेव्हा भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते का काही बोलले नाहीत? स्वतः शेपूट घालून बसायचे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बोलायला लावायचे हे योग्य नाही असेही सांगितले आहे.