प्रेरणादायी यशोगाथा शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाची वाट झाली सुकर…लग्नगाठी ही जुळाल्या…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करतांना रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणं तर शक्य नव्हतं…मात्र सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्नं तर साकार झालेचं ; पण आयुष्याचा जोडीदार ही मिळाला.

ही गोष्ट आहे. अजित व तेजश्री उबाळे या तरूण दाम्पत्यांची. अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील ‘मोहजदेवडे’ हे अजित व तेजश्री उबाळे यांचं गाव आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गंत शिष्यवृत्ती योजनेतून बेंग्लोर येथे दोघं बीएस्सी नर्सिंगची पदवी घेत आहेत.

अजित हा तृतीय वर्षाला शिकत आहे. तर तेजश्री ही शेवटच्या (चौथ्या) वर्षाचं शिक्षण घेत आहेत. अजितची घरची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे. आई दुसऱ्याच्या शेतात मजूरी करते. तर वडिल गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून काम करतात. अजितने स्वत:चे बारावीपर्यंतचे शिक्षण हे दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करून घेतले.

बारावी सायन्सला त्याला चांगले मार्कस असून ही पैशाअभावी डॉक्टर होण्याचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे त्यांने आयटीआयला प्रवेश घेतला. 2 वर्षात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात 2 वर्ष कंपनीत काम केलं ; पण मेडिकल क्षेत्रात काम करण्याच त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याने पुन्हा प्रयत्न करत ‘सीईटी’ परीक्षा दिली.

अपेक्षित गुण नसल्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. परंतु, बेंग्लोंरच्या ब्राईट कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. मात्र बीएस्सी नर्सिंगच्या चार वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शूल्काचा प्रश्न आ वासून उभा होता.

अशातच त्याला सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेविषयी मित्रांकडून माहिती मिळाली. शिष्यवृत्तीसाठी त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, अहमदनगर कार्यालयाकडे अर्ज केला. त्याचा अर्ज ही मंजूर झाला. त्याला सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षासाठी एकूण 1 लाख 43 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

सध्या त्याचं तृतीय वर्षाच्या शेवटच्या सत्राच शिक्षण चालू आहे. बेंग्लोर येथे शिष्यवृत्तीचे शिक्षण घेत असतांनाच त्याच्याच कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या कु.तेजश्री अजितकुमार लोहाळे या तरूणीशी त्याची गावाकडेच्या नात्यातून लग्नगाठ जुळून आली. 4 जूलै 2021 रोजी दोघांचा श्रीरामपूर येथे कोरोना नियमांचे पालन करत छोटेखानी विवाह ही संपन्न झाला.

तेजश्रीला सन 2017-18 व 2018-19 या दोन वर्षाची 1 लाख 46 हजार 400 रूपयांची शिष्यवृत्ती ही मिळाली आहे. “जीवनाच्या एका टप्प्यावर आपलं उच्च शिक्षण कसं होईल याची भ्रांत होती. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेमुळे आम्हा दोघांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे.

शिष्यवृतीत शिक्षण घेत असतांना आयुष्याचा जोडीदार ही मिळाला आहे. हे सर्व शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे शक्य झालं.” अशी भावना अजित व तेजश्री यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लॉकडाऊन च्या काळात अजितने जीवनधारा हॉस्पीटल व तेजश्रीने पटीयाला हॉऊस कोवीड सेंटर, अहमदनगर येथे कोरोना रूग्णांची शुश्रृषा पण केली आहे. या सेवेतून त्यांनी सामाजिक सेवेचा आदर्श ही घालून दिला आहे.

लेखन – सुरेश पाटील,जनसंपर्क अधिकारी, समाजकल्याण विभाग ,नाशिक