‘आठ दिवसांत रुग्ण वाढल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन…?’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे.

संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांतील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यांमधील काही भागात निर्बंध कमी करत दिलासा देण्यात आला आहे. नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली,

जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे.

कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण, खाटांची उपलब्धता आणि संसर्गदर या आधारे दर आठवडय़ाला निर्बंध शिथिलीकरणाचे निकष बदलण्यात येतात.

सोमवारपासून २० जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णपणे शिथिल होतील किंवा ते अंशत: शिथिल होतील. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्याने निर्बंध कमी होणे अपेक्षित होते, पण गर्दी टाळण्यासाठी तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्या स्तरातच ठेवण्यात आले.

परिणामी, गेल्या आठवडय़ाप्रमाणेच मुंबईत निर्बंध कायम राहतील आणि दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने आज,

सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे.

तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील.

गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.