अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्‍याची वेळ आता आली आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राज्यात नवा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे.गृह विभागातील राजकीय हस्तक्षेप फक्त अधिकार्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असून, या विभागात अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्‍याची वेळ आता आली आहे असा परखड इशारा भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूडबुध्दीने केलेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील प्रांतकार्यालया समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलास कोते, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, किसान मोर्चाचे अध्‍यक्ष बाबासाहेब डांगे, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, युवा मोर्चाचे अध्‍यक्ष सतिष बावके, चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपसभापती बाळासाहेब जपे,

सचिन शिंदे यांच्‍यासह नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आ.विखे पाटील यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.विसरभोळेपणा असलेल्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव आहे की हिरकमहोत्सव हे समजू नये याचे आश्चर्य वाटते.

त्यांच्या या कृतींमुळे देशाबरोबर स्वातंत्र्य सैनिकांचा सुध्दा अपमान झाला असल्याचा निषेध आ.विखे यांनी केला. मंत्री राणे यांना झालेली अटक करून आम्ही पाहीजे तसे काही करु शकतो या सरकारच्या मनमानी कारभाराला न्यायालयाने चपराक दिली असल्याचे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की,

मागील दोन वर्षापासून या सरकारचा फक्त गृहविभाग चर्चेत आहे.अधिकार्यांना हाताशी धरून सामान्य माणसांवर दहशत निर्माण करण्यासाठी या विभागात अजून किती वाजे शिल्लक आहेत हे शोधण्याची वेळ आली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नासिकच्या पोलीस आयुक्तांनी ज्या पध्दतीने अटकेची कार्यवाही केली

ते पाहाता आधिकारीही आता राज्‍यकर्त्‍यांच्‍या दबावात काम करु लागले आहेत. नियमांच्‍या बाहेर जावून केलेल्‍या या कृतीबद्दल आयुक्‍तांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बद्दल खालल्‍या पातळीवर जावून वक्‍तव्‍य केली.

परंतू तुमच्‍यावर कोणी गुन्‍हे दाखल केले नाहीत परंतू आता तुमच्‍याकडून झालेली टिका आणि दसरा मेळाव्‍यातील भाषणाच्‍या जुन्‍या रेकॉर्ड काढुन कारवाई करण्‍याची मागणी आम्‍हाला करावीच लागेल असा इशारा आ.विखे पाटील यांनी यावेळी दिला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना याप्रसंगी निवेदन देण्‍यात आले.

यामध्‍ये राणे यांना झालेल्‍या अटकेची चौकशी करुन,संबधितांवर कारवाई करावी. सुडबुध्‍दीने दाखल केलेले गुन्‍हे तातडीने मागे घ्‍यावेत, राज्‍यातील भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांवर आणि कार्यालयांवर हल्‍ले करणा-या व्‍यक्तिंवर गुन्‍हे दाखल करावेत अशा मागण्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.

जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे उपाध्‍यक्ष अॅड.रघुनाथ बोठे यांचीही यावेळी भाषणे झाली. महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्‍यात आली.

कोट – विधान परिषदेचे उपसभापती पद हे घटनात्‍मक आहे. तरीही त्‍या पदावर विराजमान असलेल्‍या शिवसेनेच्‍या नेत्‍या राजकीय वक्‍तव्‍य करीत आहेत. त्‍यांनी प्रथम आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आम्‍हाला यासाठी न्‍यायालयीन लढाई लढावी लागेल असा इशाराही आ.विखे पाटील यांनी दिला.