‘बहिणाबाईं’च्या लेकींचा शेतीत चमत्कार ! महिला शेतकऱ्यांनी गट शेती सुरु केली अन विषमुक्त कापूस उत्पादीत करून जागतिक मान्यता मिळवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Women Farmer : शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करू लागले आहेत. आता गट शेती सारख्या संकल्पना देखील मोठ्या रुजू लागल्या आहेत.

खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली कमाई करून दाखवली आहे. तालुक्यातील कोंडावळ येथील मीना पाटील यांनी गावातील इतर महिलांना सोबत घेऊन पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने बहिणाबाई शेतकरी गट स्थापन केला.

आता या बहिणाबाईंच्या लेकींनी शेतीमध्ये चमत्कार करून दाखवला असून ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून विषमुक्त कापूस उत्पादित करण्याची किमया साधली आहे. या गटाने उत्पादित केलेल्या विषमुक्त कापसाला जागतिक मान्यता मिळाली असल्याने सध्या या शेतकरी गटाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा पाहायला मिळत आहे.

एक मान्यता मिळाली असल्याने या शेतकरी गटाच्या माध्यमातून उत्पादित झालेला कापूस हा निर्यात होऊ शकणार आहे.पाणी फाउंडेशनने कोंडावळ येथे कपाशी लागवडीसाठी गटशेतीचा पर्याय सुचवला असता. गावकऱ्यांनी त्यावेळी साफ नकार दिला. मात्र मीना पाटील पुढे आल्या. बहीणाबाई शेतकरी गटाची नोंदणी केली.

खानदेशाची शान अर्थातच कवयित्री बहिणाबाई यांच्या नावाने गटाची नोंदणी झाली अन या नावाने आता सर्वत्र ओळख मिळवली आहे. सुरुवातीला पाटील यांनी तयार केलेल्या गटात उर्मिला आणि त्यांचे पती किशोर पाटील यांची साथ लाभली आणि नंतर 25 ते 26 व्यक्तींचा हा एक सक्षम गट बनला.

गट शेतीमुळे सामूहिकरीत्या कृषी निवेष्ठांची जसे की, बियाणे, जैविक खत, कामगंध सापळे, यांसारख्या गोष्टी खरेदी केल्या ज्या की मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या गेल्या असल्याने स्वस्तात पडल्या. विशेष म्हणजे त्यांनी पीक निंदनी पासून तर इतर आवश्यक अंतरमशागतीची कामे स्वतः केलीत.

यामुळे उत्पादन खर्चात भली मोठी बचत झाली. शिवाय तज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभल्याने कपाशी पिकावर आलेल्या रोगराईवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. विशेष म्हणजे त्यांनी रासायनिक खतांचा अतिशय कमी प्रमाणात वापर केला. हेच कारण होते की जागतिक मान्यता असलेल्या कंपनीने ज्यावेळी बहिणाबाई शेतकरी गटातील शेतकऱ्यांची कापसाची तपासणी केली असता विषमुक्त आढळला.

या कंपनीकडून विषमुक्त कापसाचे प्रमाणपत्र देखील गटातील शेतकऱ्यांना प्राप्त झाले. म्हणजेच हा गट चांगल्या भावात कापूस निर्यात करण्यासाठी पात्र ठरला आहे. निश्चितच गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते हे या महिला शेतकरी गटाने दाखवून दिल आहे.