‘ती’ जबाबदारी आमदार बबनराव पाचपुतेंची !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापाना जबाबदार धरायचे. आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला.

शेलार म्हणाले मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. पाणी प्रश्न माझी जबाबदारी नाही. पण मदत करण्याच्या दृष्टीने लक्ष घालत आहे. कुकडीच्या पाणी प्रश्नी काही जण माझ्या भुमिकेविषयी संशय घेतात. पण प्रत्येकाने बोलावे, पण अभ्यास करून बोलावे, असा चिमटा शेलार यांनी बाळासाहेब नाहाटा यांचे नाव न घेता मारला.

डिंबे ते येडगाव कालव्याचे डिझाईन चुकले आहे. या बोगदाप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहे, असे त्यांनी सांगितले. गॅस पाईपलाईन ठेकेदाराला कोणी किती लाख मागितले, यांची चौकशी करावी जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे, असेही शेलार म्हणाले.

यावेळी हरिदास शिर्के, संजय आनंदकर, भाऊसाहेब खेतमाळीस बाळासाहेब शेलार उपस्थित होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे सरकारने कुकडीच्या ३९५० कोटीच्या सुधारीत प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली. यामध्ये डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचा समावेश होता.

बोगद्याच्या कामासंदर्भात शरद पवार यांना भेटण्याऐवजी ज्यांनी बोगद्याच्या कामात आडवा पाय घातले आहेत, त्यांना शेलारांनी भेटावे असा प्रतिटोला आमदार बबनराव पाचपुते यांनी मारला आहे. पाचपुते म्हणाले, श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी घोड भीमेच्या पाण्यात लक्ष घातले. जलसंधारणाची कामे केली, त्यामुळे दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलले.

जनतेने सात वेळा आमदार केले आहे. त्यांचे ऋणातून उतराई होण्यासाठी काम करत आहे. ज्यांना साधे ग्रामपंचायत सदस्य होता आले नाही, त्यांच्यावर अधिक काय बोलायचे. कुकडीच्या पाण्याची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडत आहे. कुकडी पाणलोट क्षेत्रातील पाऊस बंद झाला म्हणून येडगावचे आवर्तन बंद झाले आहे.