सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे – महसूलमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. अहमदनगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील नेत्यांनी ही चळवळ जीवापाड जपताना या जिल्ह्याचा विकास साधला. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे.

ती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे महाससूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेतील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात ते बोलत होते. याप्रसंगी सन 2020-2021 या सालामध्ये शंभर टक्के वसुली देणार्‍या जोर्वे, देवकौठे, वरझडी, निंबाळे, घुलेवाडी, कुंभारवाडी, शिरसगाव धुपे, सांगवी, आनंदवाडी, वरुडी पठार, कौटेवाडी, म्हसवंडी,

आंबी दुमाला, बोटा, चिखली, निमगाव भोजापूर या 16 सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांचा ना. थोरात यांनी सन्मान केला तर 100% वसुली असणार्‍या बँकेच्या 35 शाखा अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले कि, जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू आहे. बँकेत कधीही राजकारण नको आहे म्हणून आपण पक्षविरहित सर्वांना बरोबर घेत या वेळची निवडणूक बिनविरोध केली.

बँकेने आपला लौकिक कायम जपला असून यापुढेही शेतकर्‍यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्या. महाविकास आघाडी सरकारने सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटींची कर्जमाफी मिळाली. करोना संकट आले.

अन्यथा दोन लाखाच्या पुढची ही माफी देता आली असती. परंतु ती नक्की दिली जाणार आहे. सध्या सर्वत्र करोनाचा काळ आहे. आगामी दोन महिने अत्यंत काळजीचे आहे. संगमनेर मध्ये करोना संपलेला नाही.

त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या. करोना हा कुणालाही होऊ शकतो. कोणीही भ्रमात राहू नका. काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून जिल्हा बँकेच्या चांगल्या कामाबद्दल नामदार थोरात यांनी समाधान व्यक्त केले.