जिल्हा परिषदेतील तब्बल 234 कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिल्हा परिषेदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या बदल्या सुरू आहे. करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. पहिल्या दिवशी (दि.२०) सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, तसेच कृषी विभागातील ४९ जणांच्या बदल्या झाल्या, नंतर २२ जुलैला लघू पाटबंधारे,

ग्रामीण पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागाच्या ११ बदल्या झाल्या. २४ जुलै रोजी शिक्षण विभाग, आरोग्य विभागाच्या ३४ जणांच्या बदल्या झाल्या. दि.२६ रोजी महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत, तसेच बांधकाम विभाग अशा एकूण ८१ बदल्या झाल्या.

बदल्यांच्या अखेरच्या दिवशी दि.२७ रोजी आरोग्य विभागातील आरोग्यसेवकांच्या (महिला) ४५, आरोग्यसेवक (पुरुष) १३ व आरोग्य पर्यवेक्षक १ अशा एकूण ५९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

दि.२८ रोजी परिचर वर्गाच्या होणाऱ्या बदल्या प्रशासनाने रद्द केल्याने मंगळवारीच बदल्यांची प्रक्रिया संपली आहे. तालुकास्तरावरील बदल्या गुरुवारपासून दोन दिवस होणार आहेत.

दरम्यान, यंदा बदल्यांच्या प्रक्रियेत २७ प्रशासकीय, १२५ विनंती, ८२ आपसी अशा एकूण २३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. दरम्यान यंदाच्या बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदल्याचे प्रमाण कमी असल्याने विनंती आणि आपसी बदल्या करून प्रशासन कर्मचार्‍यांची सोय करत आहे.