पितृ पक्ष व पुनर्जन्माच्या संकल्पनेचे रहस्य ! जाणून घ्या पितरांना का अर्पण केला जातो नैवेद्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : अनेकदा आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की पुनर्जन्म आहे आणि आत्म्या दुसरे शरीर धारण करतो तर आपण श्राद्ध का करावे? किंवा तो नेहमी आत्माच राहत असेल तर पुनर्जन्म ही संकल्पना चुकीची आहे का? हे गूढ उकलण्यासाठी काही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

आत्मा जेव्हा शरीर सोडून दुसरे शरीर घेतो तेव्हा या जन्मात मिळालेले संस्कार स्वतःसोबत घेऊन जातो. हे संस्कार दुसरे काही नसून त्या ‘गहन भावना’ आहेत, ज्या तो या जन्मात अतिशय उत्कटपणे जगला आहे. जसे की एखाद्याबद्दल अत्यंत आसक्ती, कोणावरचा तीव्र राग, अपराधीपणा, राग किंवा आणखी काही. म्हणजेच अशा गोष्टी कि ज्याचा मनावर खूप खोल परिणाम झालेला असतो.

*पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्ध विधी

या जन्माच्या आसक्ती आणि द्वेषाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करण्याच्या दिवसांना पितृ पक्ष म्हणतात. आता प्रश्न असा आहे की, श्राद्ध करून काय होणार? आपल्यापासून दूर गेलेल्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते, असे मानले जाते. आत्म्याला शांती म्हणजे त्या आत्म्याला संदेश देणे की तुमचे वंशज तुमचे आभारी आहेत आणि तुमच्या अपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळतील, पूर्ण करतील.

*तर्पण हे पूर्वजांच्या पुढील प्रवासाबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक

आत्म्याला या त्रासदायक भावनांपासून मुक्त करण्यासाठी मंत्र आणि इतर विधी केले जातात. आपल्या तीव्र भावनांच्या लहरी दिवंगत आत्म्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या आठवणींत वेदना वाटून घेणे हे त्यांना अस्वस्थ करते. म्हणून, वंशज म्हणून, ज्यांनी आपल्याला जन्म आणि जीवन दिले त्या आपल्या पूर्वजांच्या पुढील वाटचालीबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.