Good News : ५० हजारांचे बक्षीस जिंकण्याची शेतकऱ्यांना संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Good News : पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या हंगामात स्पर्धेच्या निकषात शिथिलता व आवश्यक बदल करण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग लाभणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये आहे.

रायगड जिल्ह्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध भागांत विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होणे, नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनांमध्ये वाढ होऊन इतर शेतकऱ्यांना त्यांचे मागदर्शन मिळावे, या हेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात भात आणि नागली या पिकांचा अंतर्भाव पीक स्पर्धा योजनेत केला आहे. स्पर्धेत सहभागासाठी भात, नाचणी या पिकांसाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर असलेला ७/१२ व ८ अ आवश्यक असून, आदिवासी शेतकरी बांधवांसाठी जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी पीकनिहाय चलन शुल्क ३०० रुपये आकारण्यात येणार आहे.

■तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या नावे जमीन असली पाहिजे व तो स्वतः शेती कसत असला पाहिजे, ही स्पर्धेची प्रमुख अट आहे. शेतकऱ्यांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येणार आहे.

■तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रुपये ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार, व तृतीय क्रमांकास रुपये २ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

तर राज्य पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय क्रमांकास ४० हजार, तर तृतीय क्रमांकास ३० हजार रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. – उज्ज्वला बाणखोले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.