Nashik News : नाशिक मधील या ठिकाणी जाण्यास मनाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik News : राज्यात पावसामुळे डोंगरकडा कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे पावसाच्या दिवसांत वनविभागाने राज्यात गड, किल्ले आणि ट्रेकिंगची ठिकाणी असलेल्या जागांवर वीकेण्डला पर्यटनासाठी बंदी घातली आहे.

नाशिकमध्येही वनविभागाने दुगारवाडी व हरीहर या अवघड ठिकाणांवर पर्यटनासाठी बंदी लादण्यात आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यात फारसा चांगला पाऊस नसला तरी रिपरिप पावसामुळे पर्यटनस्थळे निसर्गसौंदर्याने बहरली आहेत.

त्यामुळे नाशिककरांसह पर्यटकांची पाऊले त्र्यंबक परिसरात वळू लागली आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी दुगारवाडी धबधब्यात तरुण वाहून गेल्याची घटना घडली. नुकतेच इर्शाळवाडीतही डोंगर खचून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

त्र्यंबकजवळील दुगारवाडी धबधबा नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरला आहे, तसेच वीकेण्डला हरिहरगडला जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्र्यंबकेश्वर परिसर हिरवाईने नटला आहे.

हरिहरगडासह दुगारवाडी आणि नेकलेस धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. वीकेण्डला होणारी गर्दी, तसेच पावसाच्या संततधारेमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंजनेरीवरही मनाई ?

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गडावरही पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन तैनात वन कर्मचाऱ्यांना निर्बंधांबाबत सूचना दिल्या आहेत. विशेषतः वीकेण्डला पर्यटकांचे गर्दी झाल्यास गडावर प्रवेश नाकारला जाईल.

असे नाशिकहून परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले. वीकेण्डला हरिहरगड आणि दुगारवाडीला पर्यटकांची गर्दी होत असून, वन कर्मचाऱ्यांसह स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे सदस्य नियंत्रणासाठी नियुक्त केले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीकेण्डला प्रवेश मनाईचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दिला आहे.