शेतकऱ्याच्या लेकाची गगनभरारी ! अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांने एमपीएससीत मिळवला प्रथम क्रमांक, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Mpsc Success Story : देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक परीक्षा आहे एमपीएससीची. MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो स्पर्धक, विद्यार्थी तयारी करत असतात.

दरम्यान आता या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील अनिकेत सिद्धेश्वर माने देशमुख या विद्यार्थ्याने एमपीएससी मध्ये चक्क प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यामुळे अनिकेत यांच्यावर चहुबाजूने कौतुकांचा वर्षाव होत आहे. अनिकेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या वेळापूर येथील सिद्धेश्वर माने यांचे सुपुत आहेत. सिद्धेश्वर माने हे एक हाडाचे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून या शेतीत ते आपल्या परिवारासह राबतात.

अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. सिद्धेश्वर माने यांनी आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि चांगल्या कंपनीत नोकरी करावी असे स्वप्न पाहिले. मात्र त्यांच्या लेकान एमपीएससी सारख्या खडतर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा गौरव वाढवण्याचे काम केले आहे.

यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाचा देखील राज्यभर डंका वाजला आहे. अनिकेत राहुरी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच त्यांनी एमपीएससीचा देखील अभ्यास सुरू केला. विशेष बाब म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.

त्यांनी यापूर्वी देखील एमपीएससी परीक्षा दिली होती मात्र त्यांना यश संपादित करता आले नाही. यावेळी मात्र त्यांनी कसून अभ्यास केला आणि चार लाख विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. 2022 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक या पदासाठी झालेल्या MPSC ची परीक्षा त्यांनी दिली.

आता या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झाला असून यामध्ये अनिकेतचा पहिला क्रमांक आला आहे. कुठेही क्लासेस न लावता अनिकेतने स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि योग्य अभ्यासाच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या आई-वडिलांचे डोळ्याचे पारणे फेडले आहे.

निश्चितच अनिकेतने राहुरी कृषी विद्यापीठाचा आणि माळशिरस तालुक्याचा गौरव वाढवण्याचे काम केले आहे. अनिकेतने शेतकऱ्यांची मुलं आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत हे आपल्या दैदिप्यमान यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.