महाराष्ट्रातील नगर-बीड-परळी अन ‘त्या’ बहुचर्चित रेल्वे मार्गासाठी 16 हजार कोटी रुपयांची होणार तरतूद ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 16,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे आता या निधीतून महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे मार्ग विकसित केले जाणार आहेत. यामध्ये नगर-बीड-परळी ; वर्धा-यवतमाळ-नांदेड तसेच नागपूर नागभीड या मार्गाचा समावेश राहणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या रेल्वे मार्गांसाठी 16 हजार कोटीहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत काल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी दानवे यांनी महाराष्ट्रासाठी किती तरतूद या अर्थसंकल्पात झाली आहे याबाबत थोडक्यात माहिती दिली आहे. ही माहिती देताना दानवे म्हणाले की, 2014 च्या तुलनेत महाराष्ट्रासाठी मिळणाऱ्या निधी 10 पटीने वाढ झाली आहे. 2014 मध्ये 1600 कोटी रुपये एवढा निधी महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांना मिळत होता. मात्र गेल्या वर्षी या निधीत 10 पटीने वाढ झाली अन 16 हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पासाठी मिळाला आहे.

दरम्यान यावर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे कामांसाठी दोन लाख 40 हजार कोटी रुपयांचा निधी देऊ करण्यात आला असून आता या निधीचा विनियोग कसा करायचा यावर चर्चा होणार आहे. निश्चितच रेल्वे मंत्रालयात यावर चर्चा होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राला दिला जाणारा निश्चित निधीचा आकडा समजेल. परंतु गेल्या वर्षी 16 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याने यंदा देखील यापेक्षा अधिकच निधी मिळेल अशी आशा जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या महाराष्ट्रासाठी तरतूद केल्या जाणाऱ्या निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड ; नगर-बीड-परळी, आणि नागपूर-नागभीड या रेल्वे प्रकल्पांची कामे मार्गी लावली जाणार आहेत.

दरम्यान, दानवे यांनी वंदे भारत एक्सप्रेस बाबत देखील एक मोठी माहिती दिली. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यापैकी दहा वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रासाठी देऊ केल्या जाणार आहेत. या 10 एक्सप्रेस मध्ये मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश असून या दोन्ही गाड्यांचे उद्घाटन 10 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.