Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी यशस्वीरित्या सुरू आहे. विशेष बाब अशी की, यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव यादरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.
या मुंबई ते गोवा बंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबईहून कोकणात तथा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ही गाडी जून 2023 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून रेल्वे प्रवाशांनी या गाडीला विशेष प्रतिसाद दाखवला असून या गाडीचे भारमान हे इतर गाड्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
यामुळे रेल्वेला या ट्रेनमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांचा तथा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास खूपच जलद झाला आहे. मात्र सध्या स्थितीला ही गाडी आठ डब्यांची आहे. इतर अनेक मार्गांवरील गाड्या मात्र 16 डब्यांच्या आहेत.
त्यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस देखील 16 डब्ब्यांची झाली पाहिजे, अशी मागणी कोकण विकास समितीने केली असून याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्रालयाला तथा मध्य रेल्वेला देण्यात आले आहे.
यामुळे आता कोकण विकास समितीच्या या मागणीकडे रेल्वे मंत्रालय तथा मध्य रेल्वे सकारात्मक विचार करते का आणि या मार्गावर 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावत आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई हा प्रवास जलद झाला आहे. या गाडीला कोकणातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळालेला आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली तसेच थिवी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत आहे.
महाराष्ट्राला मिळणार आणखी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सध्या राज्यातील मुंबई ते गोवा, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, मुंबई ते शेगाव, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशा अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.