चर्चा तर होणारच ! अहमदनगर जिल्ह्यातील गावकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; रस्ता नाही, मग हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास आठ दशक उलटलीत. मात्र तरीदेखील सामान्य जनता अजूनही सोयीसुविधांपासून वंचितच पाहायला मिळते.

मानवाला आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही असं एक गाव आहे ज्या ठिकाणी अजून पर्यंत रस्त्याची निर्मिती झालेली नाही.

सालवडगाव पासून अगदी हाकेच्या अंतरावर, अंदाजीत दोन किलोमीटर लांब हनुमानवस्ती म्हणून पाडे आहे. या वस्तीत जवळपास साडेतीनशे लोक वास्तव्य करत आहेत. मात्र या वस्तीतून सालवडगावला जाण्यासाठी रस्ताचं नाही. जुन्या ओढ्यातून एकच कच्चा रस्ता होता ज्यावर आता बंधारा बांधण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत रस्त्याचे काम रखडले असून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना रस्त्याभाभी नानाविध अडचणींचा सामना करावा आहे. यामुळे शासनाचे उदासीन धोरण आपल्या लक्षात आलंचं असेल. विशेष म्हणजे यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला आहे.

परंतु शासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अशा परिस्थितीत शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून देखील रस्त्याची निर्मिती न झाल्याने हनुमान वस्तीवरील माजी सैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

माजी सैनिक यांनी रस्ता नाही मग निदान हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्यावे अशा आशयाचे पत्र लिहिले आहे. दत्तू भापकर असे या माजी सैनिकांचे नाव. पत्रातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरसाठी अनुदानाचे साकडे घातले असल्याने हा विषय चांगला चर्चेत आला आहे. निश्चितच माजी सैनिकांनी आपली व्यथा एका वेगळ्या ढंगात समाजासमोर मांडली असून यामुळे तरी निदान रस्त्याचे काम होईल अशी यामागील भूमिका असावी.

खरं पाहता हनुमान वस्ती ते सालवडगाव यादरम्यान रस्ताचं नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तसेच कोणी व्यक्ती जर वस्तीवर आजारी पडले तर त्या व्यक्तीला दवाखान्यात नेणं म्हणजे मोठे जिकरीचं काम.

वस्तीवासीयांच्या या समस्या जाणून माजी सैनिकांनी स्वतः रस्त्यासाठी मागणी केली. यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार, निवेदने देण्यात आली. मात्र आपल्या पाठपुराव्याला यश न आल्याने शेवटी माजी सैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी ”मला जाण्यासाठी रस्ता नाहीये त्यामुळे हेलिकॉप्टर घ्यायचे आहे. या परिस्थितीत मला शासनाकडून अनुदान मिळावे.”

निश्चितच हे पत्र लिहिण्यामागे माजी सैनिकांचा डोळे बंद करून बसलेल्या शासनाला जागा करण्याचा मानस होता. हेलिकॉप्टर अनुदानाचा हा मुद्दा आता सोशल मीडियावर चांगलाचं धुमाकूळ घालत असून यामुळे निश्चितच शासनाला घाम फुटणार आहे. आता हनुमान वस्तीमध्ये रस्ता निर्मिती होते का हे विशेष पाहण्यासारखं राहणार आहे.