Nilwande Water : दोन दिवसांत बोगद्यातून निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात येणार ! २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nilwande Water : निळवंडेतून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे बोगद्यातून दोन दिवसांत पाणी राहुरी तालुक्यात येणार असून यामुळे तालुक्यातील लाभधारक २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

सुमारे ५३ वर्षांनंतर निळवंडे धरणातून कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा जलपूजनाचा कार्यक्रम कानडगाव येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात आमदार तनपुरे यांनी लाभधारक गावातील प्रमुख पदाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बोगदा ते कालव्याची पाहणी केली.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून निळवंडे धरणातून कालव्याद्वारे तालुक्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन आयोजित केले असून या कालव्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानेच हा दिवस तालुक्याला पाहायला मिळणार आहे.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सातत्याने जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे व आमदार तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून हा निधी आणल्यामुळे हे काम होऊ शकले.

त्यासाठी आमदार थोरात यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याने त्यांच्या हस्ते गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी कानडगाव येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नवीनच कालवे तयार झाल्यानंतर हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याअंतर्गत गावांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

संगमनेर व राहुरी तालुक्याला जोडणाऱ्या सुमारे तीन किलोमीटरच्या बोगद्याचे यापूर्वीच तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हा पुल जलसंपदा विभाग, राज्य शासन, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आला आहे.

हा नेत्र दीपक प्रसंग पाहण्यासाठी निभेरे, तांभेरे, कानडगाव, कनगरसह २१ गावांतील लाभधारक शेतकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.