Ahmednagar Politics : गावपातळीवरील पॅनल-पॅनलमधील वाद लंके-विखेंना भोवणार ? प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनुचित प्रकारांमुळे अचानक गणिते बदलली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. आपापल्या उमेदवारांसाठी गावातील सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, गावपुढारी सक्रिय झाले आहेत. गावातील राजकारणही चांगले तापले आहे. पुढील सात दिवसांनी म्हणजे १३ मे रोजी मतदान आहे.

प्रचार करण्यासाठी ११ मे पर्यंत मुदत आहे. जाहीर प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरलेले आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी मतदारसंघातील गावोगावी जाऊन प्रचार केला. मतदारांशी संवाद साधला.

कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करून रणनीती आली. कुठून किती मिळेल, ही जुळवाजुळवही करण्यात येत आहे. सभा, मेळावे, बैठकांना गर्दी झाली खरी, ती मतात रूपांतर कशी होईल, यासाठी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी गावोगावचे आपापले कार्यकर्ते कामाला लावले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त असलेले गावोगावचे सरंपच, सदस्य, विकास सेवा सोसायटींचे चेअरमन, वजनदार पुढारी सक्रिय झाले आहेत. पण हे सगळे घडत असताना आता काही अनुचित प्रकार काही गावात घडताना दिसत आहेत.

पॅनल-पँनलमध्ये वाद ?
अहमदनगर लोकसभेत गावोगावी लंके व विखे यांचा प्रचार सुरु झाला व काही गावांत लंके यांना आघाडी व काही गावांत सुजय विखे यांना आघाडी मिळेल असे लोक छातीठोक सांगत होते. परंतु मागील काही दिवसांपासून गावागावातील राजकीय वातावरण थोडेसे बिघडले असल्याचे चित्र आहे. गावागावातील सोशल मीडियावरील ग्रुपवर दोघांच्या प्रचारावरून वाद होत आहेत.

लोक अगदी खालच्या पातळीवर घसरून एकमेकांना भाषा वापरत आहेत. त्याचा परिणाम गावागावात असणारे जे ग्रामपंचायत लेव्हलवरचे जे पॅनल आहेत त्यांच्यात वाद लागल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या राजकारणात गावागावात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पार्ट्या यात कधी मध्ये पडत नसतात. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून गावागावात पार्ट्या पार्ट्यात वाद सुरु झालेत.

त्यामुळे जेथे एखादा उमेदवार आघाडीवर राहील असे वाटत होते तेथे आता राजकीय वाद सुरु झाल्याने एका पॅनलवाले म्हणतात आम्ही ‘अमुकच’ उमेदवार चालवणार व दुसरा पॅनल म्हणतो तुमच्या खुनशीवर आम्ही ‘तमुकच’ उमेदवार चालवणार. म्हणजेच काय तर लोकसभेच्या मतदानावर आता गावपातळीवरील राजकीय खुन्नस, व्यक्तिगत मतभेद परिणाम करतील असे चित्र आहे. आता याचा फायदा कुणाला व तोटा कुणाला होईल हे मात्र सांगता येणे कठीण आहे. येणार काळच आता याचे उत्तर देईल.