Farmer Success Story : प्रकाशबाप्पू तुम्ही नादच केलाय थेट ! पठ्ठ्या गाईच्या दूध, शेणविक्रीतून वर्षाकाठी कमवतोय दिड कोट, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. असं असतानाही नवयुवकांना शेती ऐवजी नोकरी व्यवसायात अधिक रस असल्याचे पाहायला मिळते. शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहतात.

मात्र आज आपण अशा एका अवलियाच्या यशोगाथेवर प्रकाश टाकणार आहोत ज्याने आपल्या यशाच्या प्रकाशाने सर्व प्रकाशमय करून सोडले आहे. या अवलिया इसमाने शेतीपूरक व्यवसाय पशुपालनाच्या माध्यमातून कोटी रुपयांची कमाई करत कार्पोरेट क्षत्राला लाजवेल असं काम करून दाखवल आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील मौजे इमडेवाडीच्या प्रकाश इमडे या शेतकऱ्याने गाईच्या शेण व दूध विक्रीतून वर्षाकाठी दीड कोटींची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या या अवलिया शेतकऱ्याची पंचक्रोशीत नव्हे-नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

इमडे यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेत जमीन होती, या सोबतच त्यांच्या कुटुंबाकडे एक गाय देखील होती. अर्थातच पशुपालनाचा हा वारसा त्यांना पूर्वीपासूनच लाभला आहे. एका गायीपासून सुरू केलेले हे पशुपालन 150 गाईंमध्ये रूपांतरित केले आहे. सध्या त्याना एक हजार लिटर दूध दिवसाकाठी प्राप्त होत आहे. त्यांना प्राप्त झालेलं सर्व दूध डेअरीला घालत असतात.

प्रकाश बापू यांनी दूध आणि शेणातून दिड कोटीच उत्पन्न मिळाल आहे. निश्चितच एका गायीपासून प्रकाश दादांनी 150 गाईपर्यंत आपला व्यवसाय उभारला आहे. प्रकाश बापू  हे अल्पभूधारक शेतकरी आहेत, मात्र त्यांनी पशुपालन व्यवसायात खूपच नेत्रदीपक यश मिळवलं आहे.

त्यांनी या व्यवसायाच्या जोरावर एक कोटींचा बंगला बांधला आहे. त्याला गोधन निवास असं नाव दिलं आहे. बंगल्यावर गाईची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे. त्यांनी गाईचा फोटो देखील आपल्या देव्हाऱ्यात लावला आहे. परिवारातील सर्व सदस्य या फोटोचे दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करतात. निश्चितच ज्या गौमाताने त्यांना या शिखरावर नेऊन ठेवले आहे तिचा आदर देखील हा परिवार ठेवतो. 

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, प्रकाश दादांना गाईंसाठी रोज पाच ते सहा टन चारा लागत असतो. तेवढेच वैरण देखील जनावरांना देत असतात. त्यांनी पाण्यासाठी शेततळ्याची निर्मिती केली आहे. सध्या प्रकाश बापूंना केवळ गाईच्या शेणातून 12 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. आता बापूंनी कमी गाई जास्त दूध कशा देतील यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

ज्या गाई पूर्वी 25 लिटरपर्यंत दूध देत होत्या त्या गाई आता चाळीस लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम झाला असल्याचा दावा बापूंनी केला आहे. निश्चितच प्रकाश बापू यांनी पशुपालनात केलेली ही कामगिरी ही इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. यामुळे नोकरकपातीच्या या युगात शेती व शेतीपूरक व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे एवढं अधोरेखित झालं आहे.