फळबागा लावणे झाले आता सोपे! ‘या’ 16 फळ पिकांना मिळेल जास्तीचे अनुदान, वाचा कोणत्या फळपिकाला मिळेल प्रति हेक्टरी किती अनुदान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. अशा अनुदान स्वरूपात करण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित अनेक बाबी पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आर्थिक आधार मिळत असतो.

प्रत्येक योजनेचा विचार केला तर यासाठीच्या काही अटी किंवा मापदंड असतात यानुसार शेतकऱ्यांना  आर्थिक अनुदान देण्यात येते. याच मुद्द्याला धरून जर आपण राज्य शासनाचा विचार केला तर शासनाची जी काही फळबाग लागवड अनुदान योजना आहे तिचे मापदंड गेल्या कित्येक वर्षापासून सुधारित करण्यात आलेले नव्हते. परंतु आता राज्य शासनाने या मापदंडांमध्ये सुधारणा केली असून त्यानुसार आता सोळा वेगवेगळ्या पिकांकरिता सुधारित व वाढीव अनुदान मिळणार आहे.

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या मापदंडामध्ये सुधारणा

यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सुधारित मापदंडांना आता मंजुरी मिळाली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच आता शेतकऱ्यांना खतांवर देखील अनुदान या माध्यमातून मिळणार आहे. या सुधारणेमध्ये आता रासायनिक व सेंद्रिय खते देणे ही नवीन बाब समाविष्ट केली गेली असल्यामुळे खतांसाठी व अगोदर असलेल्या ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या दोन्ही बाबींकरिता अनुदान मिळणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे याआधी शेतकऱ्यांना जिवंत झाडांचे प्रमाण राखणे गरजेचे होते त्यानुसार तीन वर्षांमध्ये पहिल्या वर्षात 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के व तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा प्रमाणे अनुदान देण्यात येत होते. परंतु आता हे बंद करण्यात आले असून फळबाग लागवडीच्या एकूण अंदाजपत्रकानुसार आता तीन वर्षांमध्ये निश्चित रकमेनुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

यामध्ये जर आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा विचार केला तर यातून दोन हेक्टर पर्यंत अनुदान देय होते व ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना त्या अगोदर दिले जात होते. याकरिता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती आणि जमातींचे शेतकरी पात्र ठरत होते.

जॉब कार्ड नसेल तर अशा शेतकऱ्यांना अनुदान देणारी कुठलीच योजना अस्तित्वात नव्हती.त्यामुळे 2018 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून स्व निधीतून नवीन फळबाग लागवड योजना लागू करण्यात आली होती. परंतु या मधून देखील कमीत कमी अनुदान मिळत होते. त्यामुळे आता फळबाग लागवडीला चालना मिळण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या आर्थिक मापदंड मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विविध फळबागांकरिता वाढीव अनुदान मिळणे शक्य झाले आहे.

 कोणत्या फळ पिकाला मिळेल किती वाढीव अनुदान?( प्रति हेक्टरी )

या नवीन सुधारित नियमानुसार आता प्रती हेक्टरी 16 पिकांना वाढीव अनुदान मिळणार असून ते पुढील प्रमाणे….

आंबा कलमाकरिता 67 हजार पाच रुपये, आंबा कलमे( सघन लागवड पद्धत) एक लाख 29 हजार तीनशे सहा रुपये, काजू कलमे 67 हजार सत्तावीस रुपये, पेरू कलमे( सघन लागवड) दोन लाख 27 हजार 517 रुपये, पेरू कलमे 74 हजार 860 रुपये, डाळिंब कलमे एक लाख वीस हजार 777 रुपये, कागदी लिंबू कलमे 72 हजार 907 रुपये,

संत्रा व मोसंबी कलमे ८२ हजार 879 रुपये, संत्रा कलमे एक लाख 21 हजार 519 रुपये, सिताफळ कलमे 88 हजार 275 रुपये, आवळा कलमे 60 हजार 64 रुपये, चिंच कलमे 57 हजार 465 रुपये, जांभूळ कलमे 57 हजार 465 रुपये, कोकम कलमे 57 हजार 589 रुपये, फणस कलमे 54 हजार 940 रुपये, अंजीर कलमे एक लाख 13 हजार 936 रुपये,

चिकू कलमे 64,465 रुपये, नारळ रोपे बाणावली( पिशवीसह) ९३८१७ रुपये, नारळ रोपे बाणावली( पिशवी विरहित) 75 हजार 817, नारळ रोपे टी×डी( पिशवीसह ) ९३८१७ रुपये आणि नारळ रोपे टी×डी( पिशवी विरहित) 79,417 इतके वाढीव अनुदान मिळणार आहे.

अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता वाढीव अनुदान मिळणार असून यामुळे नक्कीच फळबाग लागवडीखालील क्षेत्र वाढेल अशी अपेक्षा आहे.