सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर : भाजप (BJP) नेते गपिचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापूरमधून महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच पडळकरांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आठवण करून दिली आहे.

सदाभाऊ यांनी काढलेल्या आक्रोश महाराष्ट्राचा आणि जागर शेतकऱ्यांचा ही यात्रा काढली होती त्याची सांगता सभा सोलापूरमध्ये (Solapur) झाली यावेळी या दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) तोफा डागल्या आहेत.

गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्रजींना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) करण्यासाठी 105 आमदार दिले. मात्र सनेने मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून बारामतीच्या नेतृत्वाखाली मविआ सरकार स्थापन केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदी बसवल्यावल्याचा अनेकांना आनंद झाला, पण भ्रष्टाचार वाढला. आमच्या हातात सत्ता दिली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले, आता कोणाचा सातबारा कोरा झाला सांगा? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला. त्यामुळे फडणवीस साहेब कुप्रवृत्तीला नांगरतील त्यासाठी त्यांना प्रतिकात्मक नांगर भेट दिला.

शेतकऱ्यांचे वीज कट करत आहेत. मविआ म्हणतंय की भाजप सरकारने बिल थकीत ठेवले म्हणून आता महावितरण तोट्यात आली. पण मी कागद आणलाय की राज्यातील 3 कंपन्यांनी भाजप सरकारच्या काळात एक रुपया वसूल केले नाही तरीही कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या.

मग आता कंपन्या तोट्यात कशा जातात? कारण मविआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार सुरुय म्हणूv कंपन्या तोट्यात गेल्या. जर उजनीच्या बाजूला असलेल्या तुळशी गावात पाणी देत नाहीत, पण उजनीतून पाणी पळविण्याचे काम मविआ सरकार करतंय, असेही पडळकर म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यांनीही आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईच्या सभेत मुख्यमंत्री मुंबईत पहिल्यांदा मास्क काढणार म्हणून बातम्या आल्या.

अरे काय चंद्राचा मुखडा आहे काय? काही बोललं की शिवसेना नेते नेहमी म्हणतात 13 कोटी जनतेचा अपमान झाला. अरे हे काय तुमचे प्रॉडक्ट आहे का ? सगळ्यांचा अपमान व्हायला.

भाजपचे कोणीही आत गेले की गुन्हा एका ठिकाणी घडतो आणि गुन्हे 12 ठिकाणी दाखल होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांना वेठबिगाऱ्यासारखे वापरु नका, असे म्हणत त्यांनी होय देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असेही ठणकावून सांगतले.

तुम्ही पुन्हा आलात की हे गडी पहिल्या डब्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा आलात की ह्यांना सुट्टी देऊ नका, असेही सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांना सांगितले आहे.

खोत पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हाल आहेत. 20 टन ऊस गेला की 2 टन काटा मारतात. उजनीचे पाणी बारामतीला निघालंय. मला बारामतीचा अंदाज येत नाही कारण आख्खी नीरा नदीला बारामतीला नेली आता उजनीचे पाणी नेत आहेत.

त्यामुळे आम्ही संघर्ष करत आहे त्यामुळे आम्हाला साथ द्या. पालकमंत्री यांना सांगतो तुम्ही कंस मामा बनू नका. तुम्ही कंस मामा बनलात तर ही जनता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने कृष्ण होऊन तुमचा नाश करेल, असा इशाराही खोत यांनी यावेळी दत्ता भरणे यांना दिला.

तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांकडे बघत नाही. ही आलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावी ही जनतेची इच्छा आहे, असेही खोत म्हणाले.