बिबट्यासाठी ठेवलेली शिकार अज्ञात व्यक्तीनेच पळवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याने अनेकांवर हल्ले केले आहे, तसेच अनेक प्राण्यांची शिकार देखील केली आहे.

या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवलेला बोकडच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील सुर्यनगर परिसरातील नागरिकांना गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे.

या बिबट्याने एका हरीण मादीची देखील शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते.

बिबट्याचे दर्शनाने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली होती. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे धास्तावलेल्या सूर्यनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने 19 जून रोजी सूर्यनगर भागात बिबट्याचा पिंजरा लावला होता.

बिबट्याला पिंजर्‍यात अडकवण्यासाठी बोकड सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवण्यात आला होता. परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिबट्याच्या पिंजर्‍यातील बोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा बोकड कोणी चोरून नेला त्याचा शोध सुरु आहे.

दरम्यान बिबट्याचे भक्षंच अज्ञाताने पळविल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे येण्याची शक्यता कमी आहे. हा बिबट्या आता कसा पकडला जाणार या चिंतेत नागरिक दिसत आहे.