“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात आता राजकारणाचे नवे समीकरण सुरु असल्याचे दिसत आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अटकेवरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई पोलीस यांच्यावर आरोप केले आहेत.

त्यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणाले, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही दंडेलशाही राज्य सरकारने खपवून न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी

अतुल लोंढे पुढे म्हणाले, किरीट सोमय्या हे धादांत खोटे आरोप करून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करत आहेत. वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांवरही बिनबुडाचे आरोप करत आहेत.

खासदार नवनीत राणा यांना खार पोलीसांनी अटक केल्यानंतर रात्री खार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या व त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला.

आपली हत्या करण्याचा डाव असल्याचा त्यांचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. आज पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या यांनी गोंधळ घालत पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री यांना आव्हानाची भाषा केली असेही लोंढे म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राज्यात अराजक माजवण्याचे काम ते करत आहेत.

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सोमय्या सारखे जे लोक राज्यातील शांतता भंग करून वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. दररोज खोटे आरोप करून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत.

प्रशासकीय कामाकाजात अडथळे आणत आहेत त्यांच्यावर सरकारने सक्तीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.