Cotton Farming : शेतकऱ्यांनो मोह आवरा…! कापसाचे फरदड उत्पादन घेणे टाळा ; नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. सध्या कापसाची वेचणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा भरदडोत्पादनाकडे वळवला असल्याचे चित्र खान्देश मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागात पाहायला मिळत आहे.

खरं पाहता कापसाचे फरदड उत्पादन न घेण्यासाठी कृषी विभाग वारंवार शेतकऱ्यांना सावध करत असते. मात्र, रब्बी हंगामात नव्याने पीक पेरणीसाठी बियाण्यापासून ते खतांपर्यंतचा सर्वचं खर्च वाढत असल्याने शेतकरी बांधव फरदड उत्पादन घेण्यास पसंती दर्शवतात.

खरं पाहता, फरदड उत्पादन घेण्यासाठी कापसाची अंतिम वेचणी झाल्यानंतर केवळ पाणी आणि खताची एक मात्रा दिली जाते. एवढ्यातच कापूस पीक फुलू लागत. निश्चितच फरदड कापसाचे उत्पादन कमी असते आणि अशा कापसाची गुणवत्ता देखील कमी असते.

मात्र कमी खर्चात उत्पादन मिळत असल्याने शिवाय बाजारात कापसाला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कायमच फरदड कापूस उत्पादनाकडे कल पाहायला मिळतो. मात्र फरदड कापसाच्या उत्पादनामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा धोका वाढतो यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना फरदड कापसाचा मोह आवरण्याचा सल्ला दिला आहे.

खरं पाहता राज्यातील बहुतांशी भागात कापूस हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. काही ठिकाणी अजूनही कापूस वेचणी सुरू आहे मात्र बहुतांशी ठिकाणी कापूस वेचणी ही झाली आहे. ज्या ठिकाणी कापूस वेचणी झाली आहे अशा ठिकाणी आता शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे चित्र आहे.

मात्र फरदड उत्पादनामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अखंडित सुरू राहते. यामुळे किडीस निरंतर खाद्य मिळत राहते. अशा परिस्थितीत पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्‍वभूमीवर गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फरदड उत्पादन टाळले गेले पाहिजे असे तज्ञ नमूद करत आहेत.

दरम्यान जाणकार लोकांच्या मते बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस वेचणी झाल्यानंतर, पाच ते सहा महिने कापूस विरहित शेत ठेवावं. फरदड उत्पादन घेऊ नये कारण की, गुलाबी बोंड अळीला जर खाद्य उपलब्ध नसेल तर ती सुप्तअवस्थेत जाते मात्र जर फरदड घेतलं गेलं तर गुलाबी बोंड आळीला पुन्हा एकदा खाद्य उपलब्ध होते आणि तिचे चक्र सुरूच राहते.

यामुळे कापूस वेचणी झाल्यानंतर रोटाव्हेटर किंवा श्रेडर यांसारख्या यंत्राद्वारे पऱ्हाट्यांचे छोटे तुकडे करून ते जमिनीत गाडावे यामुळे गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे.